जैसी मही हे उद्भिजे । जनी अहंबुद्धीविण सहजे । आणि तेथींची तिये बीजें । अपेक्षीना ।। तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ।।
संन्यासी आणि कर्मयोगी याबद्दल माऊली श्री ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील ओवी क्र. 44 ते 47 यामध्ये म्हणतात, ज्याप्रमाणे पृथ्वी “माझ्यामुळे हे उत्पन्न झाले’ हा अभिमान न बाळगता स्वतःच्या अंगावर सहज पडलेल्या बीजांमधून मोठमोठे वृक्ष निर्माण करते आणि त्या वाढलेल्या झाडांच्या फळांची आशा धरीत नाही.
त्याचप्रमाणे स्वतःच्या या जन्मातील वा पूर्वजन्मांतील कर्मांमुळे (म्हणजे अन्वयाने) वा सद्य सामाजिक परिस्थितीने जी कर्मे समोर येतात. ती सर्व स्वशक्तीनुसार पार पाडण्याचा प्रयत्न करीत असताना कर्म करणारे माझे शरीर म्हणजे मी नव्हे या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून स्वकर्मांपासून मिळणाऱ्या फळांकडे जो संपूर्ण दुर्लक्ष करतो. तोच संन्यासी आहे आणि निश्चित त्यालाच (कर्म) योगीश्वर म्हणतात, हे अर्जुना लक्षात ठेव.