महाभारताची महती सांगताना माऊली म्हणतात, आता ऐका ती रसभरीत कथा. ती सकळ कौतुकाचे जन्मस्थान आहे, विवेकतरूंचे ते अभिनव उद्यान आहे, सर्व सुखांचा उगम तिथूनच होतो.
सिद्धांताचा तो महान ठेवा आहे. नवरसांच्या अमृताने परिपूर्ण झालेला सागरच आहे. फार काय, आपल्या समोर प्रगट झालेले ते परब्रह्म आहे. सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. सर्व शस्त्रे तिथे आश्रयाला आलेली आहेत.
सकळ धर्मांचे ते माहेरघर आहे. सज्जनांचे जिव्हाळ्याचे स्थळ आहे. सरस्वतीचे लावण्यरत्नभांडार आहे. व्यासांच्या महान बुद्धीत प्रवेश करून स्वतः सरस्वतीच या ग्रंथाच्या रूपाने त्रिजगतात प्रगटली आहे. म्हणून हा ग्रंथ काव्यांचा राजा आहे.
ग्रंथाच्या थोरपणाची ही सर्वोच्च सीमा आहे. इथेच नवरसांच्या रसाळपणाला सुंदर रूप लाभले. इथूनच शब्दसंपत्तीला विशुद्ध शास्त्ररूप प्राप्त झाले. आणि इथेच ब्रह्मज्ञानाच्या अंगी असलेली भावनांची कोमलता दुणावली.