परी करूनि फळ नेघे। तो जगाच्या कामीं न रिघे। जे त्रिविध जग अवघें। कर्मफळ हें ।।238।। देव मनुष्य स्थावर। या नांव जगडंबर । आणि हे तंव तिन्ही प्रकार । कर्मफळांचे ।।239।। तेंचि एक गा अनिष्ट। एक तें केवळ इष्ट। आणि एक इष्टानिष्ट। त्रिविध ऐसें ।।240।। परी विषयमंतीं बुद्धी। आंगीं सूनि अविधी। प्रवर्तती जे निषिद्धीं। कुव्यापारीं ।।241।। तेथ कृमि कीट लोष्ट। हे देह लाहती निकृष्ट। तया नाम तें अनिष्ट। कर्मफळ ।।242।।
(अध्याय 18) कर्म करून जो फलाची आशा करीत नाही, तो जन्ममृत्यूच्या सपाट्यात सापडत नाही. कारण, हे तीन प्रकारचे जग कर्माचे फल आहे. देव, मनुष्य व स्थावर यालाच जग म्हणतात आणि हे तिन्ही प्रकार तर कर्मफलाचेच आहेत. तेच कर्म एक अनिष्ट (प्रतिकूल), एक केवळ इष्ट (अनुकूल) आणि एक इष्टानिष्ट (मिश्र) असे तीन प्रकारचे आहे. जे विषयासक्त आहेत, हे अविधीचा अंगीकार करून निषिद्ध व वाईट अशा कर्माचे ठिकाणी प्रवृत्त होतात आणि त्यायोगे कृमी, कीटक असे वाईट देह पावतात. त्याला अनिष्ट कर्मफल म्हणतात.