हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ।। 1 ।। तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ।। 2 ।। हरिउच्चारण मंत्र पैं अगाध । पळे भूतबाधा भय याचें ।। 3 ।। ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ।। 4 ।।
हरिनामाचा जप केल्याने पापाच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. गवताचा व अग्नीचा संबंध झाला की ते गवत अग्निरूप होते, त्या प्रमाणे हरीचा जप निरंतर करीत असले, म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. हरीच्या नाममंत्राचे सामर्थ्य अपूर्व आहे.
त्याचे धाकाने भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच्चबाधा नाहीशी होते, इतकेच नव्हे, तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते; म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही.