कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेचि घरीं । परि परागु सेविजे भ्रमरीं । येरां चिखलुचि उरे ।। 58 ।। नातरी निदैवाच्या परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ।। 59 ।। तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ।। 60 ।। अध्याय 9 वा
ज्ञानाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आत्मज्ञानरूप धर्माविषयी श्रद्धा न ठेवणाऱ्या आणि फलस्वरूप भगवंताला प्राप्त न होता, जन्म-मृत्यूच्या संसाररूपी चक्रात फिरत राहणाऱ्या लोकांविषयी भाष्य करतात. कमलाचा कंद आणि बेडूक या दोघांचेही राहणे एकाच चिखलाने व्याप्त घरात असते.
परंतु दूरचे भ्रमर कमलातील सुगंधी परागाचे सेवन करतात आणि जवळच्या बेडकांना मात्र चिखलच शिल्लक राहतो किंवा एखाद्या भाग्यहीन मनुष्याच्या घरी सोने, चांदी, हिरे यांनी भरलेल्या लोखंडाच्या घागरी हजाराच्या वर पुरून ठेवल्या आहेत.
परंतु त्याला त्या संपत्तीचे ज्ञान नसेल तर तो त्या घरात बसून जसा उपवास करतो किंवा दारिद्य्राचे जीवन जगतो. त्याप्रमाणे सर्व सुखांचे विश्रांतीस्थान असा जो मी श्रेष्ठ योगी “राम’ हृदयात कायम असताना, मला न जाणता मूर्ख लोक फक्त विषय सुखाचीच इच्छा करतात.