ऐशी देहाआंतु स्थिती । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती । आणि सामासही वोडवती । दक्षिणायन ।।233।। इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेंनि आइके? ।। 234 ।। ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणौनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ।।235।।
प्रयाण समयी सकाम कर्मयोगाच्या मार्गाने पुनर्जन्माच्या गावाला जाण्यासाठी अप्रशस्त काळा विषयी संत ज्ञानेश्वर माऊली येथे आपली भूमिका स्पष्ट करतात. या काळात मृत्यू समयी शरीरात दुःस्थिती असते.ज्ञानशक्ती आणि चेतनाशक्ती क्षीण झालेली असते.
बाहेर कृष्ण पक्षामुळे चंद्राचा प्रकाश कमी होत जाऊन रात्रीच्या अंध:काराकडे वाटचाल करणारा असतो. दक्षिणायनातील सहा महिन्यांपैकी एक महिना असा योग प्राप्त होतो. या प्रमाणे पुनर्जन्म पुरक जन्म- मरणाच्या फेऱ्यात पाडणारे योग त्याच्या मरण समयी जुळून येतात, त्यामुळे तो साधक स्वरूप प्राप्तीची कथा कशी ऐकू शकेल?
अशा स्थितीत त्याचा देह पडतो, त्याला पुण्यकर्म करणारा योगी म्हणून चंद्रलोकाला जाणे भाग पडते. मग तेथून तो भोगप्राप्त कर्माचा क्षय होताच पुन्हा माघारी मृत्युलोकी जन्मास येतो.