अदेवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ।।53।। जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ।।54।। आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां । ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ।।55।। अध्याय 11 वा
उपरोक्त ओवींच्या आधारे माऊली येथे भगवंताच्या उपदेशामृताने परमगुह्य प्राप्त झालेल्या पार्थाचे मनोगत व्यक्त करतात. ते म्हणाले, देवा मी आता गंधर्व नगरी सोडून बाहेर पडलो आहे. मी इतके दिवस पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. भगवंता सर्प कापडाचाच होता, पण तो चावला आहे असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र येत होत्या.
याप्रमाणे भ्रमाने व्यर्थ मरणाऱ्या जीवाला मला वाचविण्याचे श्रेय तू घेतले आहेस. विहिरीतील आपले प्रतिबिंब न कळल्यामुळे आपला प्रतिस्पर्धी दुसरा सिंह आहे, अशा समजुतीने मूर्ख सिंह आता प्रतिस्पर्ध्याचा नाश करण्याकरिता विहिरीत उडी घालील, असे जाणून एखाद्या महापुरुषाने त्याला जसे आवरून धरावे, त्याप्रमाणे अनंता माझे तुम्ही अशा भ्रमापासून रक्षण केले आहे.