जरी कल्मषाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । हौनी अससी ।। तर्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें। हें आघवेंचि गा थोकडें। ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये।। देखैं विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ।।
ज्ञानापासून दूर राहणाऱ्या समाजाला जागृत करण्यासाठी किंवा ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्या साधकांना ज्ञानाच्या सामर्थ्याविषयी माऊली येथे सखोल मार्गदर्शन करतात. तू पातकांचे आगर, भ्रमाचा सागर आणि मोहाचा डोंगर जरी असलास तरी या परम ज्ञानाच्या शक्तीशी तुलना केली असता हे सर्व तुच्छ आहे, असे या आत्मज्ञानात सर्वांचा नाश करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे.
हे पाहा की विश्वाच्या अस्तित्वाचा जो मोठा भ्रम आहे किंवा ब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्याच्या छायेसारखा हा जो थोर सर्व विश्वाचा आकार आहे तो भ्रमाने भासतो. तो भ्रम देखील त्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. थोडक्यात प्राप्त ज्ञानामुळे संपूर्ण विश्व भ्रम नाहीसा होतो.