श्रीगुरूचेनि नांवें माती । डोंगरीं जयापासीं होती । तेणें कोळियें त्रिजगतीं । येकवद केली ।। चंदने वेधलीं झाडें । जालीं चंदनाचेनि पाडें । वशिष्ठें मांडली कीं भांडे । भानूसीं काठी ।।
माऊली म्हणतात, श्रीगुरूवरील आपल्या श्रद्धेमुळेच आपणास म्हणजेच शिष्याला ज्ञान होत असते. तसेच गीतेतही भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धावान पुरूषालाच ज्ञान प्राप्त होते. भिल्ल समाजातील एकलव्याला द्रोणाचार्यांनी शिकविण्यास नाकारले.
परंतु त्यांनी द्रोणाचार्यांच्या नावाने पुतळा तयार करून विद्या शिकली आणि कोळियाच्या नावाची जगात किर्ती केली. चंदनाच्या झाडामुळे इतर झाडेही सुगंधित होतात. “गुरूकृपे मज बोलविलें देवे । होईल हे घ्यावें हितकाही ।। याप्रमाणे माझ्या गुरूकृपेने मला देव भेटला. आपलीही ज्ञानासाठी अशीच श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. मग ज्ञान, कौशल्ये स्वत:हून आपल्याकडे येतात.