म्हणौनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ।। 456 ।। जैसें तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ।। 458 ।।
श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताहेत की, कोण कोणत्या जाती, कुळ, वर्णात, कोठे जन्माला आले याला काहीच महत्त्व नाही. हे सर्व भेदभाव कारणाशिवाय निर्माण झालेले आहेत. सर्वांनी मला प्राप्त होणे हेच एक सार्थक आहे. जसे नाले व ओढे गंगेला मिळाल्यावर गंगारूपच होतात. सर्व नद्या सागराला मिळाल्यावर समुद्ररूपच होतात. त्यांच्यात नावाचा भेदभाव राहात नाही.
“विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ’ किंवा “यारे यारे लहान थोर । याती भलती नारीनर । करावा विचार । नलगे चिंता कोणाची।।’ असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. हा महान समतेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, जातिनिर्मूलनाचा विचार संतांनी मांडलेला आहे. म्हणून संतांनी कुळ, जाती, वर्ण रहीत संघटना निर्माण केली हे त्यांचे फार मोठे कार्य आहे..