चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ।।
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ।।
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील अभंगात म्हणतात, चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे ही हरीचेच वर्णन करीत आहेत. ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याप्रमाणे चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे यामध्ये सारभूत असणाऱ्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या कथांचा मार्ग टाकून दे.
हरी जो एक आत्मा त्याची व्याप्ती मायोपाधिक शिवामध्ये व अविद्योपासक जीवामध्ये एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा साधनांमध्ये तू आपले मन घालू नको.
माऊली म्हणतात, हरि म्हणजेच वैकुंठ. हरी हे त्या वैकुंठाचे नाव आहे. त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे.