नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ।।1।। अनंत जन्मांचें तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठी ।।2।। योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठी ।।3।। ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरीविण नेम नाहीं दुजा ।।4।। हरिपाठ अभंग संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली येथे हरीच्या नामस्मरणाची महती सांगतात.
हरिपाठातील अभंगात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिनामाच्या कीर्तनाची वैष्णव जनांनी जोड केलेली असते, त्यायोगाने त्यांची अनंत कोटी पातके नाहीशी होतात. अनंतजन्मी केलेल्या तपांचे फल एक हरीचे नामस्मरण आहे. सर्व साधनामध्ये हरीचे चिंतन हे सुलभ साधन होय.
अष्टांगयोग, यज्ञक्रिया, धर्म व अधर्मरूपी माया ही सर्व हरीच्या चिंतनाने लयाला जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणी यज्ञ याग, क्रिया, धर्म सर्व काही हरी आहे. त्यावाचून दुसरा
काही नेमधर्म नाही. हरीच्या नामस्मरणातच खरे सुख, समाधान आणि आनंद सामावलेला आहे. एक हरिनामच आहे जे तुम्हाला सर्व पापातून मुक्त करू शकते. हरी नामस्मरण, हरि नामसंकीर्तन हेच खरे साधन होय.