सद्गुरूस्तवन
संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूचे, म्हणजे वडीलबंधू श्री निवृत्तीनाथ यांचे स्तवन करीत आहेत. सद्गुरूंनी मला या संसार सागरातून तारले आहे. ते माझ्या हृदयात सतत आहेत. म्हणूनच माझे विवेकावर विशेष प्रेम आहे.
डोळ्यात विशिष्ट अंजन घातले म्हणजे दृष्टी समर्थ होऊन जो मार्ग दिसतो तो मोठ्या ठेव्याकडे नेतो किंवा चिंतामणी हातात आल्यावर नेहमी सर्व मनोरथ पूर्ण होतात. तशाच निवृत्तीनाथांमुळे माझ्या सर्व कामना पूर्ण झाल्या आहेत.
म्हणून म्हणतो, जाणकार श्रोतेहो, मुळांना पाणी घातले म्हणजे जशी आपोआपच फांद्यापानेही संतोषतात किंवा एका समुद्रस्नानाने जशी त्रिभुवनातली तीर्थे घडतात किंवा एका अमृतरसाच्या सेवनाने जसे अखिल रस लाभतात, तसे गुरूभजनाने मनुष्य कृतकृत्य होतो. म्हणून मी पुनःपुन्हा श्रीगुरूंनाच अभिनंदन केले आहे. मनाच्या सर्व आवडी पुरवणारा तोच एक आहे. (ज्ञा. 1/22-27)