नगर – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओच्या कामातून मुक्तता करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने घेतला असल्याचे दोन दिवसापूर्वी शिक्षक संघटनांनी जाहीर केलेले असताना निवडणूक शाखेचे जिल्हा उप निवडणूक अधिकारी यांनी शिक्षकांची या कामातून मुक्तता झाली नसल्याचे स्पष्ट केले.
जर इतर कर्मचारी उपलब्ध असतील तरच शिक्षकांना बीएलओची कामे दिली जाणार नाहीत. मात्र अंगणवाडी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ही कामे जमणार नसल्याने हा भार शिक्षकांवरच पडणार हे उघड आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये नाराजी व संतापाचे वातावरण असून त्यांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बीएलओ धारकांची कामे करताना जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची मोठी कसरत होत होती. 90 टक्के बीएलओ हे प्राथमिक शिक्षक आहेत. विशेषतःमहिला शिक्षकांना याच जास्त त्रास सहन करावा लागतो. शिवाय ही कामे करूनही निवडणूक शाखेच्या नोटीसा तत्सम कारवायांचा ससेमिरा सुरुच असायचा.
त्यामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांनी समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्र येत या निवडणुकांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. शिक्षकांनी निवडणुकीच्या कामातून सुटका व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात आंदोलने सुरु केली होती. मात्र हा जाच नव्या आदेशाने कायम राहणार आहे.
त्यामुळे शिक्षक समन्वय समितीने बहिष्काराचे अस्त्र पुन्हा उगारले असून याविषयावर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रशासनाने नोटिसा दिल्यास त्या न डगमगता घ्याव्यात असे आवाहनही समितीने केले आहे.