नवी दिल्ली -भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामन्यास 17 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. हा सामना ऍडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळण्यात येणार आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेत भारतीय संघाची खरी परीक्षा असणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या काही माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात कशी रणनीती असावी याबाबत गुरुमंत्र दिला आहे.
यात अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड या दिग्गजांनीही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला पराभव करण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. या दोन्ही दिग्गजांची मतं वेगवेगळी असली तरी यातून भारतीय संघाला विजयाची गुरुकिल्ली नक्कीच मिळेल.
अनिल कुंबळे म्हणाला, कसोटी मालिकेतील पहिल्याच लढतीत भारताने वर्चस्व गाजविणे आवश्यक आहे. कोहली ही एकमेव कसोटीच खेळणार असल्याने मायदेशी परतण्यापूर्वी तो संघाला कशा प्रकारे दिशा दाखवतो, हे महत्त्वपूर्ण ठरेल. दोन वर्षांपूर्वीसुद्धा भारताने पहिली कसोटी जिंकून त्यानंतर मालिकेत 2-1 असे यश संपादन केले.
त्यावेळच्या तुलनेत आताचा ऑस्ट्रेलियन संघ अधिक भक्कम असल्याने भारताने पहिला सामना किमान अनिर्णीत राखणेदेखील निर्णायक ठरेल. यामुळे हा सामना जिंकून भारताने उर्वरित मालिकेसाठी पायाभरणी करावी. त्याशिवाय भारताचे गोलंदाज यावेळीही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना हैराण करतील, अशी आशा कुंबळेने व्यक्त केली.
राहुल द्रविड सल्ला देताना म्हणाला, या कसोटी मालिकेसाठी पुजाराप्रमाणे मैदानावर स्थिरावून संयमानं फलंदाजी केली पाहिजे. त्यावेळी आपला विजय सुकर होईल. गेल्या दौऱ्यात पुजारानं संयमी फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. पुजाराच्या तीन शतकांच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती.