वेल्हे – तब्बल दोन आठवडे दडी मारलेल्या पावसाने वेल्हे तालुक्यात पुन्हा दमदार “एन्ट्री’ घेतल्याने भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. गुंजवणी नदी दुथडी भरून वाहत असल्याने साखर मार्गासनी दरम्यानच्या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असून तेथील गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून पाऊस नसल्याने वेल्हे तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडला होता. भात लावणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केल्यानंतर मध्येच पावसाने दडी मारल्याने भात खाचरे कोरडे पडले होते. त्यातच गेल्या 48 तासांपासून जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडी पडलेले भात खाचरे, ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात पुन्हा आशेचे किरण फुलले आहे. दोन दिवस सतत पाऊस पडत असल्याने धरणे भरण्यास सुरुवात झाली आहे.
तर साखर-मार्गासनी दरम्यानच्या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी या पुलावरून पाणी वेगाने वाहत असते. अशा परिस्थितही तेथील नागरिक जीव मुठीत घेवून वाहत्या पाण्यातून पुलावरून प्रवास करीत असल्याने प्रशासनाने आगमी काळात येथे उंचीवर नवीन पुलाची उभारणी करावी अशी मागणी जोर धरीत आहे.