“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।। जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।’ आज “गुलमोहर’मध्ये पाटाची जागा डायनिंग टेबलने घेतली; पण जेवणाआधी श्लोकाचे पठण केल्याशिवाय तोंडात कोणी घास घालत नाही. वसंतराव जोशींना म्हणजेच आप्पांना दोन मुले. हरिदास आणि मनोहर. दोघांनीही बांधकाम व्यावसायात आपले पाय घट्ट रोवले होते. हरिदासची मुलगी मृण्मयी; हॉटेल मॅनेजमेंटची तयारी करत होती.
खरं तर मंजिरीला म्हणजेच मृण्मयीच्या आईला वाटायचं; मृण्मयीनेसुद्धा आपल्यासारखंच गायन शिकावं. कुठल्या तरी “स्वरमीलन’ संगीत क्लासमध्ये हरिदास आणि मंजिरीची ओळख झाली होती. कधी तिथे त्यांचे “मनोमीलन’ झाले आणि हा “हरी’ कधी तिचा “दास’ झाला; कळलंच नाही! पहाटे चारच्या रियाजाला उठून आईबरोबर “सा रे ग म प…’चा सूर आळवण्यापेक्षा; माईबरोबर स्वयंपाकघरात बसून कोथिंबिरीच्या वड्याला फोडणी देत “खा रे अ मा प…’चे “बकासुर’च मृण्मयीच्या जिभेवर जास्त रेंगाळत असायचे! आणि मग तेव्हापासून तिच्या करिअरला वेगळीच फोडणी बसली! तर तिकडे मनोहरचा मुलगा मंगेश; बांधकाम व्यवसायातली सूत्रे हळूहळू शिकत होता.
धाकटी सून नात्याने मनोहरची बायको शालन; घरातली सगळी कामं करायची. आप्पा-माईंच्या हातात गोळ्या देण्यापासून ते अगदी रियाजाला बसण्यापूर्वी जाऊबाईंच्या हातात गरम पाण्याचा ग्लास देईपर्यंत. “एवढं पुढंपुढं नको करत जाऊ माझ्या.’ यावर शालन हसून म्हणायची, “छोट्या बहिणीने मोठ्या बहिणीची सेवा केली तर काय फरक पडतो?’ तर अशाप्रकारे गुलमोहरमधलं वातावरण नेहमी हसतं खेळतं असायचं.
त्यादिवशी जेवताना, “माई, लोणच्याची वाटी सरकव ना इकडे.’ हरिदासने एक-दोन फोडी आपल्या ताटात घेतल्या. “तुला देऊ?’ “नको नको. घसा बसेल.’ “अगं, चाखून तर बघ. काय मस्त मुरलंय! हो ना मृण्मयी?’ “पप्पा, लोणचं खावं ना तर फक्त माईच्या हातचंच! एकदम चटपटीत.’ “तुम्ही बाप-लेक मुद्दाम माझ्या तोंडाला पाणी सुटावं म्हणून करताय.’ माई हसून, “तू नकोस लक्ष देऊ त्यांच्याकडे.’ “आता मला पण राहवत नाही. द्या ती वाटी.’ असं म्हणत मंजिरी लोणचं चाखू लागली आणि सगळ्यांचा एकच हशा पिकला. काहीवेळाने जेवण आटोपले आणि सगळे अंगणात येऊन बसले.
“बरेच दिवस झाले मैफिल रंगलीच नाही. काय मनोहर?’ “आप्पा, अगदी माझ्या मनातलं बोललात.’ तेवढ्यात मंगेश, “आजोबा, नुसती मैफिल नको; सिंगिंग वॉर झालं पाहिजे. काकी व्हर्सेस काका.’ “आता हे आणि काय नवीनच?’ “माई, त्याला जुगलबंदी म्हणायचंय. म्हणजे मम्मा आणि पप्पांचं गाण्यात भांडण लावून द्यायचं.’ “हो का? म्हणजे इथंही तुझा पप्पाच हरणार तर!’ माईच्या बोलण्यावर सगळेजण हसू लागले. “माई, कधीतरी तुझ्या पोराच्या बाजूने बोल की.’ तेवढ्यात आप्पा, “हरी, आम्ही आहोत तुझ्या बाजूने. आज बघूच कोणाचं पारडं जड आहे?’ “माई, मी आलेच.’ असं म्हणून शालन आत गेली.
थोड्यावेळाने, “जोशींच्या दरबारी जमलेल्या तानसेन आणि कानसेनांनो, आधी शालनच्या हातचा मसालेदार चहा पिऊन आपल्या गळ्याला शेक द्या आणि मग नंतर जुगलबंदीचा आस्वाद घेत; तल्लीन होऊन खुशाल आपल्या माना “शेक’ करत बसा!’ दोघा नवराबायकोच्या जुगलबंदीत मेल व्हर्सेस फिमेल आखाडाच जणू भरला होता! हरीच्या केदार रागाला, “व्वा… काय सूर लावलास!’ म्हणून आप्पांची दाद मिळताच; मंजिरीच्या यमनला तिच्या गोटातून, “क्या बात है!’ची मनमुराद दाद मिळत होती.
या चढाओढीत शेवटी दोघांनी मिळून गायलेल्या भैरवीने मात्र दोन्ही पार्ट्यांची युती झाली आणि सगळ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. “अहो, कोणाचं पारडं जड होतं?’ माईच्या प्रश्नावर आप्पा हसून, “दोन्ही पारड्यातले भाव एकच होते गं. हम्म आमचे वस्ताद तसूभर कमी पडले आणि तुमची पोरगी थोडा भाव खाऊन गेली एवढंच!’ महिलामंडळींनी “हिप हिप हुर्रे…’ म्हणत एकच जल्लोष केला.
“खरंय आप्पा. मी थोडा कमीच पडलो. रोजच्या सरावापासून मी लांब गेलो; पण मंजिरी मात्र संसार सांभाळून तिच्या कलेशी प्रामाणिक राहिली.’ “असं काही नाही हो. आजही तुमच्या आवाजात तीच आर्तता आहे. त्याहीवेळेस मी तुमच्या याच सालस स्वराच्या प्रेमात पडले आणि आज पुन्हा…’ असं म्हणून मंजिरी लाजून हसू लागली. “मम्मा, तू पप्पाला माई-आप्पासमोर डायरेक्ट प्रपोज केलंस. मानलं बुवा तुला!’ माई आणि आप्पा एकमेकांकडे पाहून हसू लागले.
“मंजिरी, तुला बक्षिस तर मिळणारंच.’ “काय बरं?’ हरिदास उठून उभा राहिला.
“तमाम रसिकहो, ऐका. उद्या जोशींच्या सुनेचं गृहखातं आम्ही सांभाळणार आहोत. सकाळच्या चहा-नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणाची जिम्मेदारी आमचीच!’ हे ऐकून महिलामंडळींनी भुवया उंचावल्या. तेवढ्यात आप्पा, “उद्या आम्ही सगळे पुरुषमंडळी किचन सांभाळणार. तुम्ही आरामखुर्ची आणि सोफ्यावर बसून फक्त रिमोट चालवायचा.’ “अहो आप्पा, “आम्ही’ म्हणजे “मी’!’ “दादा, आप्पा बरोबर बोलतायत. तुझ्या पराजयात आम्ही पण वाटेकरी आहोत.’ “ठीकंय तर मग. उद्या सकाळी आपली भेट किचनच्या रणांगणावरच!’ माई हसून,”पोरींनो, उद्या आपल्याला उपवास घडू नये म्हणजे मिळवलं!’
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुरुषमंडळींनी किचनचा ताबा घेतला. तिकडे माई पूजाअर्चा करून आरामखुर्चीत बसल्या होत्या; तर शालन आणि मंजिरी वर्तमानपत्र चाळताना चहाच्या वाटेकडे डोळे लावून होत्या. प्रातः वेळेत घ्यायचा चहा घड्याळाच्या बरोबर दहाच्या ठोक्याला एकदाचा हजर झालाच! “अहो, राहू द्या ना. करतो आम्ही स्वयंपाक.’ मंजिरीच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून, “प्रिये, माझ्या उपहाराचा तू उपहास करू नकोस!’ म्हणत हरिदास किचनमध्ये निघून गेला. मंजिरीने डोक्याला हात लावून घेतला. “माई, खरंच आज आपल्याला उपवास घडणार. मृण्मयी, जरा किचनमध्ये डोकावून येतेस का?’ थोड्यावेळाने मृण्मयी हसतच आली.
“असं वेड लागल्यासारखं काय हसतेस?’ “मम्मा, मी जे पाहिलं ते पाहून तुम्ही पण…’ असं म्हणून पुन्हा ती पोट धरून हसू लागली. “काय पाहिलंस?’ “पप्पांनी पिठात पाणी; की पाण्यात पीठ कालवलंय तेच कळेना! पप्पा गाळणीतून पीठ गाळून घेत बाजूला करत होते! काका तर डोळ्यावर गॉगल लावून कांदा कापत होता; तरी त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं! आप्पा त्याला विचारत होते की; हेल्मेट आणू का? आणि तिकडे मंग्या दादा गुगलवर व्हॉइस सर्च करत होता. जिरे, मिरे आणि मोहरी कशी दिसते? मळणीत आणखी थोडं पीठ टाकावं; साधं एवढं कसं सुचलं नाही कुणालाच?’ हे ऐकून शालन आणि मंजिरी अक्षरशः लोटपोट होऊन हसत होत्या आणि माई कपाळ धरून बसल्या होत्या!
“मम्मा, माझ्या डोक्यात एक सुपर प्लॅन आलाय.’ मृण्मयी तिघींच्या कानाजवळ कुजबुजली. “मस्त प्लॅन आहे. लगेच कामाला लाग.’ “हॅलो. नाईक काका? आजोबांना तुमच्याशी बोलायचंय. फोन चालूच ठेवा.’ “काकी, तू टीव्हची मागची पिन काढ. मम्मा, हे बंद पडलेलं सेल रिमोटमध्ये टाक आणि तुम्ही दोघी किचनच्या मागच्या दाराजवळ येऊन थांबा.’ मृण्मयीने आप्पांना खुणावून बाहेर बोलावून घेतलं. “नाईक काकांचा फोन आलाय.’ “हरी, मी आलोच रे.’ म्हणत आप्पा निघून गेले. थोड्यावेळाने, “पप्पा, तुम्हाला आप्पांनी अर्जंट बोलावलंय.’ मृण्मयी किचनमध्ये आली.
“काका, माईने बोलावलंय. टीव्ही बंद पडलाय.’ “हो का? मंग्या, आलोच मी.’ एकेक करून मृण्मयीने या तिघांना बाहेर काढलं. “दादू, काय शोधतोस?’ “जिरे, मिरे, मोहरी. ये मृण्मयी, जाम भूक लागलीय. हेल्प प्लिज.’ “तेच करायला आलीय; पण कुणाला सांगशील तर बघ!’ मृण्मयीने मागचे दार उघडून त्या दोघींना आत घेतले. “बाई… बाई… काय रे ही किचनची अवस्था केलीय मंग्या?’ “मी नाही काकी. त्या तिघांनी.’ बराच वेळ झाला तरी तिकडे आप्पांचं बोलणं काही संपेना आणि मनोहरला टीव्ही काही चालू होईना! “तू माझ्या मागे का उभा?’ “तुम्हीच बोलावलं ना?’ “मी?’ “दादा, आलाच आहेस तर टीव्ही दे ना चालू करून.’
तोपर्यंत तिकडे किचनमध्ये या तिघींनी “बिनसलेलं’ सगळं कसं अगदी “उत्तम’ करून मोहीम फत्ते करत; चोर दरवाजाने पलायन केलं! “जेवण तयार आहे.’ मंगेशचा आवाज ऐकून तिघांनीही किचनकडे धाव घेतली. किचनमध्ये नुसता खमंग वास सुटला होता. तिघांनी आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहिलं. आप्पांनी मंगेशचा कान पकडला. “तू केलंस हे सगळं?’ हो… नाही…च्या गोंधळात मंगेशने खरं सांगितलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. मृण्मयीचा आवाज आला. “आप्पा भूक लागलीय.’ “आलो आलो.’ जेवण टेबलवर हजर झाले. माईने घसा खाकारल्यासारखं केलं.
“पोरींनो, माझं तर नुसत्या वासानेच पोट भरलं बाई. सुगरणीपेक्षा काही कमी नाहीत आप्पा आणि त्यांची पोरं!’ खाली मान घालून चौघींना हसताना पाहून मंगेशला जोराचं हसू फुटलं आणि त्याला पाहून या तिघांनाही. “मंजिरी, तुमचं बिंग फुटलंय. सॉरी. आम्ही तुमची जागा कधीच नाही घेऊ शकत! आज मला बहिणाबाईंच्या ओळी आठवतायत. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, मग मिळते भाकर.
संसाराचा गाडा हाकताना तुमची किती दमछाक होत असेल हे कळलंय आम्हाला. सुगरणीची चव ती काय; फक्त तुमच्याच हाताला येऊ जाणे!’ तेवढ्यात माई बोलू लागल्या. “या गाड्याचं एक चाक आमची पोटं भरण्यासाठी सतत उन्हातान्हात झिझत असतं. मग दुसऱ्या चाकाने नको का गाडा सावरायला!’ सगळेजण भावुक झाले होते. “आप्पा, जोराची भूक लागलीय. वदनी कवळ घेताय ना?’ गेली कित्येक वर्षे, वदनी कवळ घेतानाचा सूर ऐकत “गुलमोहर’ अजूनच बहरत होता..!
अमोल भालेराव