सातारा -“स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत गुरुवारी (दि. 29) सकाळी पावणेअकरा वाजता ऑनलाइन सरपंच संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील सरपंचाशी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या विषयी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ भारत मिशनंतर्गत देशभरात “स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून देशभरात सुरु असलेली पाणी व स्वच्छताविषयीच्या कामांचा आढावा घेण्यात येतो. याचबरोबर या उपक्रमात मंत्री व सरपंच असा थेट संवादही आयोजित केला जातो.
जेणेकरुन गावोगावी सुरु असलेल्या कामांची माहिती राज्य व केंद्रस्तरावर मिळण्यास मदत होते. गुरुवारी होणारा तालुकास्तरिय सरपंच संवाद मोबाइलवर न घेता शासकीय कार्यालयात घेण्याचे आदेश आहेत. याबाबत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. या संवादासाठी राज्यस्तरावरुन लिंक दिली जाणार आहे.