यावर्षीच्या अखेरपर्यंत नियोजित असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुका देशातील २०२४ लोकसभा निवडणुकांची लिटमस चाचणी असणार आहेत. गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभेद्य किल्ल्ला मानला जातो. येथे भाजप गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत आहे. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने याच ‘गुजरात मॉडेल’ला प्रोजेक्ट करून मोदींना देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवले होते. २०१९ मध्ये देशाच्या जनतेने पुन्हा मोदींना जनादेश दिला होता. अशातच आता २०२४ लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांसाठी अनेक अर्थाने महत्वाच्या ठरणार आहेत. ( PM Modi vs Kejriwal )
२०१७ विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का
गुजरातच्या २०१७ विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजपचा विजय झाला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शहा आणि भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी गुजरात पिंजून काढल्यानंतर देखील त्या निवडणुकांमध्ये भाजपच्या १६ जागा कमी होऊन ९९ पर्यंत खाली आल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र राज्यात जोरदार मुसंडी मारत आपल्या खात्यात १६ जागांची भर घालून ७७ जागा जिंकलेल्या. भाजपला या निवडणुकांमध्ये १४,७२४,४२७ तर काँग्रेसला १२,४३८,९३७ मतं मिळाली होती. यावरून २०१७ ची विधानसभा निवडणूक भाजपसाठी सोपी नव्हती हे तर स्पष्टच आहे.
यंदा आम आदमी पक्षाशीही करावे लागणार दोन हात ( PM Modi vs Kejriwal )
१८२ संख्याबळ असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष असा तिहेरी सामना रंगणार आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचा किल्ला असलेला पंजाब खालसा करून आता मोदींचा गुजरात काबीज करण्याची मोहीम आखली आहे. सुरुवातीला आम आदमी पक्षाने काँग्रेसचे प्राबल्य असलेला आदिवासी बहुल भाग पिंजून काढला. यामुळे गुजरातेत आम आदमी पक्ष विरुद्ध काँग्रेस असा सामना होईल, भाजपचे प्राबल्य असलेल्या जागांना धक्का लागणार नाही असे कयास बांधले जात होते.
मात्र केजरीवालांनी आता आपला मोर्चा शहरी मतदाराकडे वळविला असून यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. गुजरातमधील जनता भाजपच्या शासनाला कंटाळली असून सत्ता परिवर्तन होईल या भीतीने भाजपने दिल्ली व पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला असल्याचं आम आदमी पक्षाचे नेते सांगतायेत. अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात रणशिंगच फुंकले असल्याने भाजपला यंदा काँग्रेससोबतच आम आदमी पक्षाशीही दोन हात करावे लागणार आहेत.
काँग्रेस – आम आदमी पक्ष हातमिळवणी करणार?
पंजाबमध्ये काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष असा थेट सामना रंगला होता. आपच्या झाडूने पंजाबमधून काँग्रेसचा साफसफाया करत एकहाती सत्ता काबीज केली होती. पंजाब वगळता इतरही राज्यांमध्ये काँग्रेस व आम आदमी पक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. एवढंच काय तर एरवी भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करते असा गळा काढणाऱ्या काँग्रेसने आम आदमी पक्षाच्या नेत्यांवरील कारवाईचे मात्र समर्थन केले आहे. हे चित्र पाहता काँग्रेस व आम आदमी पक्ष निवडणूकपूर्व खुली युती करतील अशी शक्यता नसल्या बरोबर आहे.
मात्र काँग्रेस नेतृत्व व आम आदमी पक्षाने राजकीय चातुर्य दाखवत निवडणुकांच्या तोंडावर छुपी युती केल्यास ती भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते असं राजकीय जाणकार सांगतायेत. सद्य राजकीय परिस्थिती पाहता आप – काँग्रेस पडद्यामागुनही एकत्र येतील का? यावर प्रशचिन्ह कायम असले तरी यापूर्वी दिल्लीमध्ये आपने काँग्रेसोबत केलेली हातमिळवणी विसरून चालणार नाही.
भाजपची अडचण
राज्यात भाजप २७ वर्षांपासून सत्तेत आहे. मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या रूपाने देशाला विकास आणि हिंदुत्वाची सांगड घालणारी प्रयोगशाळा दिली. याच गुजरात मॉडेलचा देशभरात गवगवा झाल्याने मोदींना पंतप्रधानपदापर्यंत मजल मारता आली. असं असतानाही २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेत भुईसपाट झालेल्या काँग्रेसने २०१७ गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलीच फाईट दिली. कोव्हीड काळात गुजरातेत रुग्णालयांच्या बाहेर लागलेल्या रांगा, बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर झळकल्या होत्या. मात्र गुजरातमध्ये परिस्थिती आटोक्यात असल्याचे दावे सत्ताधाऱ्यांनी केले होते.
असं असलं तरी कोव्हिडचे संकट टळल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणुकांना वर्षभराचा अवधी उरला असताना विजय रूपांनी यांचे संपूर्ण कॅबिनेटचं रद्द केले व त्यांच्याजागी भूपेंद्र पटेल यांना बसवलं. पटेल यांच्यासह मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांना कोणताही अनुभव नसून त्यांच्यावर रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करतायेत.
गुजरात विरुद्ध दिल्ली मॉडेल ( PM Modi vs Kejriwal )
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात गुजरात मॉडेलचा गवगवा झाला होता. त्याचा थेट फायदा भाजपला निवडणुकांमध्ये होऊन काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली होती. हिंदू आणि विकास या दोन्हींची सांगड घालणाऱ्या मोदींच्या गुजरात मॉडेलला हिंदी पट्ट्यात लोकप्रियता मिळाली आहे. सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० हटवणे, तीन तलाक, राम मंदिराची उभारणी हे मुद्देही आता मोदींच्या मॉडेलमध्ये जोडले गेले आहेत.
तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलचीही देशभरात चर्चा आहे. शाळांचे आधुनिकीकरण मोफत शिक्षण, वीज आणि आरोग्य सेवा हे केजरीवालांच्या दिल्ली मॉडेलचे स्तंभ आहेत. दिल्लीनंतर केजरीवालांनी याच मॉडेलच्या आधारावर पंजाब काबीज केले आहे. काही दिवसांपूर्वीच मोदींनी केजरीवालांचे नाव न घेता त्यांच्या मॉडेलवर ‘रेवडी कल्चर’ अशी टीका केली होती. मोदींच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी, मोदी श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ करतात ते खरे रेवडी कल्चर असल्याचं म्हंटलं होत. या घडामोडी पाहता गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन्ही मॉडेलची देखील कसोटी लागणार आहे.
गुजरात मोहीम फत्ते केल्यास केजरीवालच ठरणार पंतप्रधानपदाचे दावेदार? ( PM Modi vs Kejriwal )
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचं मानलं जात. मात्र पंजाबमध्ये विजयश्री खेचून आणलेले केजरीवाल सध्या या रेसमध्ये सर्वात पुढे असल्याचं दिसतंय. आम आदमी पक्ष हा देशात एकमेव असा प्रादेशिक पक्ष आहे ज्याची सत्ता दोन राज्यांमध्ये आहे. अर्थात काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने तो पंतप्रधानपदाचा नैसर्गिक दावेदार ठरतोच. गुजरातेत केजरीवाल यांना यश मिळाल्यास मात्र हे चित्र पूर्णपणे पालटलेले दिसेल. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष एका छत्राखाली लढल्यास केजरीवाल यांचं नेतृत्व त्यांना स्वीकारावे लागेल.