अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेवरून भाजपने कॉंग्रेसला घेरण्याचे प्रचारतंत्र अवलंबले आहे. त्यामुळे गुजरात रणसंग्रामाच्या ( Gujarat Election ) केंद्रस्थानी पुन्हा मोदी आल्याचे दिसते. गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशात भाजपने आता प्रचाराची रणनीती बदलून ती मोदीकेंद्री बनवल्याचे सूचित होत आहे.
मोदी हे गुजरातचा अभिमान आहेत. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह टीकाटिप्पणी म्हणजे संपूर्ण गुजरातचा अपमान आहे, अशी भूमिका भाजपने मांडण्यास सुरूवात केली आहे. त्यामागील पार्श्वभूमी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्या पक्षाचे नेते मधुसूदन मिस्त्री यांनी केलेली वक्तव्ये आहेत. खर्गे यांची सोमवारी गुजरातमध्ये सभा झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी मोदींना लक्ष्य केले.
मोदी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करण्याचे आवाहन सर्व निवडणुकांत करतात. मतदारांनी त्यांचा चेहरा किती वेळा पाहायचा? मोदींना रावणासारखी 100 तोंडे आहेत काय, असे सवाल खर्गे यांनी केले. तर, मोदींना त्यांची औकात दाखवली जाईल, अशा आशयाचे वक्तव्य मिस्त्री यांनी केले. मोदींवरील टीकेवरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारीच कॉंग्रेसवर पलटवार केला.
मोदींना उद्देशून रावण म्हणणे हा त्यांच्याबरोबरच गुजरातचा अपमान आहे, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर बुधवारी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातमधील प्रचारात सहभागी होताना कॉंग्रेसवरील शाब्दिक हल्ल्याची धार आणखी वाढवली. मोदींविषयीच्या टीकाटिप्पणीतून कॉंग्रेसचे नैराश्य उघड होते.
मोदींना पंतप्रधान म्हणून पाहणे सोनिया गांधी, राहुल गांधी या कॉंग्रेस नेत्यांना नेहमीच अवघड गेले. त्यातून त्यांनी वारंवार मोदींविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांचीच री कॉंग्रेसचे इतर नेते ओढत आहेत, असे नड्डा यांनी एका रोड शोवेळी म्हटले. तर, राजनाथ यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसवर शाब्दिक तोफ डागली. मोदींवरील टीकेतून कॉंग्रेस नेतृत्वाची मानसिकता उघड होते. पंतप्रधान म्हणजे केवळ व्यक्ती नसून एक संस्था असते.
मोदी म्हणजे गुजरातचा अभिमान आणि गौरव आहेत. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यांना गुजरातची जनता योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले. एवढेच नव्हे तर, भाजपने मोदींविषयी कॉंग्रेस नेत्यांनी आजवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची आठवण करून देणाऱ्या पोस्टही सोशल मीडियावर टाकल्या. त्यातून भाजपने अंतिम टप्प्यात गुजरातमध्ये प्रामुख्याने मोदी कार्ड पुढे करण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते. मोदींचा करिष्मा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा आधार घेऊन गुजरातची सत्ता राखण्याची भाजपची रणनीती असल्याचे त्यामुळे सूचित होत आहे.