नवी दिल्ली – सत्येंद्र जैन यांना तुरूंगात मिळत असलेल्या सुविधांच्या संदर्भातील व्हिडिओ उघड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष यांच्यात तुंबळ शाब्दीक युध्द पेटले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच लक्ष्य केले आहे. शहा यांनाही तुरूंगात असताना व्हीआयपी सुविधा मिळत होत्या असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
भाजपचे लोक आरोप करत आहेत. बोगस स्टिंग ऑपरेशन करत आहेत. जैन यांना जे तुरूंगात मिळाले तो त्यांचा इलाज आहे. मात्र अमित शहा जेव्हा गुजरातचे मंत्री होते तेव्हा त्यांना तुरूंगात जे काही मिळाले जी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली ती जैन मिळालेले नाही. भाजपचे लोक घाणेरडे राजकारण करत आहेत व ते रोज मला शिव्या देत आहेत असे दावे केजरीवाल यांनी केले आहेत.
दरम्यान, गुजरात राज्यात वेगळाच प्रकार पाहायला मिळतो आहे. ते म्हणजे आम आदमी पक्षाचे राज्यात अजुन आमदारच नाहीत. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (AAP’s Gujarat polls candidates moved to unknown location) ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांना पळवले जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी उमेदवारांनाच अज्ञात स्थळी हलविले आहे.
त्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आपचे सूरत पूर्व मतदारसंघातील उमेदवार कांचन जरीवाला यांनी नाट्यमय रित्या माघार घेतली होती. जरीवाला अचानक गायब झाले होते व ते प्रकटले ते थेट त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीच. तेही प्रचंड पोलीस बंदोबस्तात. त्या घटनेनंतर पक्षाने ही सावधगिरीची भूमिका घेतल्याचे मानले जाते आहे. भारतीय जनता पार्टीनेच आमच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप आपने केला आहे व हा आरोप भाजपने अगोदरच फेटाळला आहे.