भ्रष्ट राज्यांमध्ये तिसरा : 5 वर्षांत तब्बल 40 हजार तक्रारी दाखल
गांधीनगर: भारतातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उपाययोजना केल्या. यातील सर्वात गाजलेला त्यांचा निर्णय म्हणजे नोटाबंदी. या निर्णयाचा प्रमुख उद्देश होता भ्रष्टाचार रोखणे. मात्र नुकत्याच एका अहवालातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य असलेले गुजरात हे राज्य भ्रष्ट राज्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे मोदींच्या राज्यात काय चालययं काय असा प्रश्न सर्वासामान्यांना पडला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त भ्रष्टाचार हा तमिळनाडू आणि ओडिसा या राज्यांमध्ये झाला आहे. यानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंद करण्यात आली आहे. गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल 40 हजारहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे.
याबाबतचा अहवाल गृहमंत्री प्रदीप सिंग जडेजा यांनी सादर केला आहे. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2017 आणि 2018मध्ये भ्रष्टाचाराच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. गुजरातमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार हा महसुल विभागात झाला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नागरी विकास आणि तिसऱ्या क्रमांकावर गृह मंत्रालय विभागाचे नाव आहे. निती आयोगाने प्रति कोटी नागरिकांमागे तमिळनाडूत सरासरी 2 हजार 492.45, तर ओडिसात 2 हजार 489.83 असा आकडा दिला आहे.