पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी या महासंकल्प अभियानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी 20 हजार विद्यार्थ्यांना कडुनिंबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्यांच्या वारी मार्गावर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांमार्फत अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात वारीमार्गावरील स्वच्छता, 50 लाख पानाच्या पत्रावळ्याचे वाटप, 700 टन ओला कचरा व निर्माल्य संकलन, 350 टन सेंद्रीय खतनिर्मिती, 35 लाख लिटर पाण्याची बचत, 1 लाख वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी व सेवासुश्रुषा, 1 लाख चष्म्यांचे वाटप, पथनाट्याद्वारे 2 लाख वारकरी व गावकऱ्यांचे प्रबोधन, कडुनिंबाच्या 20 हजार रोपांची वारीवार्गावर लागवड करून संगोपन करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे.