पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार
मुंबई- पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविली आहे. पाटील यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी बारामतीची जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी हा विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर काही दिवसांपासून राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कॉंग्रेसचे बंडखोर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
विखे-पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. त्यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अन्य नेत्यांच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत. गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपाध्यक्ष व केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा केली. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविली आहे. पाटील यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी बारामतीची जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने “बारामती’ला घेरण्याची पूर्ण तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे बरोबरच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रीपद आहे.
रावल व तावडेंकडे अतिरिक्त कार्यभार
भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदार व मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्याकडील असलेली खात्यांचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. रावल यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, तर तावडेंकडे संसदीय कार्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.