पुणे – पावसाने मुळा-मुठा नद्यांना पूर आला, शेकडो नागरिक आश्रय शोधत आहेत. अशा वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मदतीबाबत बेजबाबदारपणा दाखवला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.
पुराचे पाणी वाढल्याने हजारो लोकांचे स्थलांतर झाले. पालिका शाळा, मोकळी ठिकाणे पाहून लोकांनी आसरा शोधला. त्यांची जेवणाची व्यवस्था स्वयंसेवी संस्था, कार्यकर्त्यांनी केली. वास्तविक महापालिकेने जेवण देणे आवश्यक होते, तसे घडले नाही. महापौरांनी पाहणी दौरा केला, पण त्यात पूरग्रस्तांना दिलासा मिळेल असे काही नव्हते. पालकमंत्र्यांनी प्रशासन आणि पुणेकरांना वाऱ्यावर सोडले. सोपस्कार न करता पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचवणे हे पालकमंत्र्यांचे काम होते. पण, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप जोशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे. पूरग्रस्तांना प्रत्येक कुटुंबामागे 10 हजार रुपये तातडीने सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी जोशी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.