अमरावती : अमरावतीमधील अचलपूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यात आपल्या सर्वांची मदत व्हावी, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सर्व नागरिकांना केले आहे. यासाठी त्यांनी समाजमाध्यमातून ध्वनीचित्रफित एक संदेश प्रसारित आवाहन केले आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यात आपल्या सर्वांची मदत व्हावी. काल अचलपूरमध्ये जी घटना घडली, त्याची दखल पोलीस प्रशासनाने घेत, तेथे शांतता व कायदा सुव्यवस्था प्रस्थापित केलेली आहे.
या घटनेमुळे कुणीही घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या सेवेसाठी, मदतीसाठी आम्ही 24 तास उपलब्ध आहोत. तसेच पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यापुढे जाऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व बांधवांना-भगिनींना शांतता राखा अशी नम्र विनंती केली आहे. आपल्या अमरावतीची शांततेची अमरावती, सलोख्याची अमरावती अशी जी ओळख आहे, ती तशीच टिकवून ठेवायची असल्याचे त्यांनी या संदेशात नमूद केले आहे. तसेच आपण कोणत्याही भूल-थापांना बळी पडू नका. अमरावतीच्या आजूबाजूला राहून जे लोक शांततामय वातावरण बिघडवू पाहत आहेत, त्याला वेळीच रोखण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.