पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
शिराळा (प्रतिनिधी) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे.