पुणे – “शेतकऱ्याला सन्मान द्यायचा असेल तर शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. तो पुन्हा कर्जबाजारी होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे. तो मिळाला तर शेतकरी कर्जमुक्त होईल,’ असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
एम.एस.पी. किसान गॅरंटी मोर्चाच्या वतीने किमान हमीभाव अनिवार्य कायद्यासंदर्भात आयोजीत राज्यव्यापी कार्यशाळेत माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एम.एस.पी. किसान गॅरंटी मोर्चाचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, कर्नाटकाचे चंद्रशेखर कुडीहळ्ळी, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, दिगंबर भिसे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे, तो मिळाला तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. दीडपट हमी भाव मिळावा ही स्वामीनाथन आयोगाने शिफारस केली आहे. ती अंमलात आणल्यास कायमस्वरुपी शेतकरी कर्जमुक्त होईल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना व्ही. एम. सिंग म्हणाले, “हमीभाव कायदा करण्यासाठी प्रत्येक गावात, राज्यात हमीभाव कायद्याची चळवळ झाली पाहिजे. त्याबाबत प्रबोधन झाले पाहिजे.’
राष्ट्रवादी-भाजपला अधिकार नाही
बदलत्या हवामानामुळे शेतीचे चक्र बदलले आहे. त्यामुळे शेतीतील उत्पादन आले की ते गोदामात ठेवले तर त्याची सुरक्षा होईल. यासाठी आता वेअरहाऊस उभारण्यासाठी 90 टक्के सवलत सरकारने द्यावी, अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादीची सत्ता होती तर भाजप भाववाढ झाली पाहिजे यासाठी आंदोलन करीत होते. आता भाजप सत्तेत असून राष्ट्रवादी आंदोलन करीत आहे. पण या दोन्ही पक्षांना या मागणीसाठी आंदोलनाचा नैतिक अधिकार नाही, अशी टोला पाटील यांनी लगावला.