दिल्ली – वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. महागाईच्या मुद्द्यावर विरोधक देखील संसदेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढत्या महागाईवरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. संसदेत बोलताना सुळे यांनी मराठीतील काही ओळींचा दाखला देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टोला लगावला आहे.
दत्त, दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय, सायीचे लोणी, लोण्याचे तूप… यामध्ये केंद्र सरकारने फक्त दत्त आणि दत्ताची गाय या दोघांना वस्तू व सेवा कराच्या चौकटीत आणलेले नाही, बाकी दूध, साय, लोणी, तूप सगळ्या वस्तूंवर ‘जीएसटी’ लागू केला आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लगावला आहे.
कीर्ती दुबे नावाच्या ६ वर्षीय मुलीने पेन्सिसह इतर गोष्टी महाग झाल्याबाबत पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच भाजपच्या माजी मंत्री सुषमा स्वराज यांच्या महागाईबाबतच्या विधानाची आठवण देखील यावेळी सुळे यांनी सरकारला करून दिली. सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या,सामान्य माणसाला अर्थकारणाची भाषा कळत नाही. सामान्य माणसाला त्यांच्या खिशातुन काय जात आहे आणि त्याबदल्यात त्याला काय मिळत आहे फक्त एव्हढंच कळत.