नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात तब्बल साडेतीन हजार टन सोन्याचे साठे सापडल्यानंतर भारतीय भूगर्भ सर्वेक्षणतर्फे तेथे युरेनियमचा शोध घेण्यात येत आहे, जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (जीएसआय) अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
कुद्री हिल भगात एरोमॅग्नेटिक सिस्टिमद्वारे हेलिकॉप्टरमधून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शेजारील राज्यातही असे सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगण्यात आले. अनेक टन युरेनियम या भागातून उपलब्ध होण्याची शक्याता आहे. जीएसआयच्या पथकाने या डोंगरावर खोदकाम करून तीन ठिकाणी नमुने घेतले आहेत, असे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या युरेनियम साठ्यांची नेमकी खोली शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अणू उर्जा विभागातील अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जीएसआयचे पथक येथे दीर्घकाळापासून कार्यरत आहे. नेमके किती युरेनियम सापडेल ते आतच सांगणे कठीण आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावरच त्याबाबत अनुमान बांधता येईल, असे खाण अधिकारी के. के. राय यांनी सांगितले.
लखनौ विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रा. ध्रुवसेन म्हणाले, सोनभद्रच्या डोंगरात युरेनियम आढळले आहे. मात्र त्याचे स्वरूप समजणे तेवढेच महत्वाचे आहे. जर युरेनियम मोठ्या प्रमाणात सापडले तर त्यामुळे देश प्रचंड बलशाली होऊ शकेल.
सोनभद्रचे जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांनीही या महितीला दुजोरा दिला. ते म्हणाले, दोन डोंगरांवर सोन्याचे साठे सापडले आहेत. आता युरेनियमचा शोध सुरू आहे.