नवी दिल्ली, दि.18- लॉक डाऊनमुळे विकास दर ज्या वेगाने कमी झाला आहे तेवढ्याच वेगाने तो वाढेल असा दावा अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी केला आहे. ते म्हणाले की, सध्या पसरलेला निराशावाद अयोग्य असल्याचे लवकरच दिसून येईल.
ते म्हणाले की, स्पॅनिश फ्ल्यू जेव्हा 1920 च्या सुमारास जगात आला होता. त्यावेळी असेच निराशाजनक चित्र निर्माण झाले होते. मात्र यातूनही जग सहीसलामत बाहेर आल्या आणि अधिक वेगाने पुढे गेले. भारतातील आर्थिक पॅकेज अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योगांना तग धरून राहता येईल आणि करोनाव्हायरस संपल्यानंतर अधिक वेगाने उत्पादकता वाढविता येऊ शकेल.
सध्या उलाढाल कमी झाली आहे. त्यामुळे सध्या उद्योगांना कामगारांना कामावर कायम ठेवण्यास मदत व्हावी अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी 1991 प्रमाणे दीर्घ पल्ल्याच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे सर्व क्षेत्राची उत्पादकता आगामी काळात वाढणार आहे. त्याचबरोबर देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याबरोबरच निर्यातही वाढणार आहे. छोट्या उद्योगांना तगून राहण्यासाठी केंद्र सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे तारण विरहित कर्ज उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे करोना व्हायरस संपल्यानंतर भारत वेगाने पुढे जाईल असे ते म्हणाले.