- चाचणीच्या रांगेतच संसर्ग होण्याची भीती
- औद्योगिक क्षेत्रातच चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी
पिंपरी- औद्योगिकनगरीतील मोठ्या, मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रात काम करणारा वर्ग आणि कामगारांना प्रत्येक पंधरा दिवसाला करोनाची आरटीपीसीआर अथवा अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र त्यासाठी लागणारा वेळ, रांगेत थांबल्यावर दुसऱ्या व्यक्तीकडून संक्रमणाची भीती या सर्व बाबींमुळे दर पंधरा दिवसांनंतर करोनाच्या चाचणीस कामगार वर्गातून विरोध होऊ लागला आहे.
उद्योग क्षेत्रात विविध भागातून स्टाफ व कामगार येत असतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या भावनेतून संबंधितांच्या करोना तपासणी करण्याचा नियम शासनाने पारित केला आहे. त्या अनुषंगाने शहरात सुरू असणारे पन्नास टक्के उद्योगांमध्ये कामासाठी येत असणाऱ्या स्टाफ आणि कामगारांना दर पंधरा दिवसाला करोना संदर्भात तपासणी अनिवार्य केली आहे. विविध उद्योग क्षेत्राकडून कामगारांचा तपासणी अहवाल मागविण्यात येत आहे. महिन्यातून दोन वेळा त्यासंदर्भातील चाचणी अहवालास महत्व प्राप्त झाले आहे.
उद्योग क्षेत्राकडून आयुक्तांना कंपन्यांमध्येच ही तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच काही खासगी लॅब चालकांना उद्योग क्षेत्रातून याबाबत विचारणा केली होती; मात्र लाखो कामगारांची करोना चाचणी करण्यासाठी यंत्रणा सक्षम नसल्याने ही मागणी सर्वांकडून धुडकावून लावण्यात आली. मोठ्या कंपन्यातील कामगारांना ने – आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे; परंतु मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रात या सुविधा नसल्याने शहरातील चाचणी केंद्रांवर जात तिथे रांगेत उभे राहून तपासणी करून घ्यावी लागत आहे. ही तपासणी करताना रांगेत उभे राहावे लागते. त्याठिकाणी संक्रमण होण्याची भीती कामगारांमध्ये आहे. तसेच अहवाल देण्यासही विलंब होत असल्याने कामगारांना विनाकारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम कामावरही होत आहे.
उद्योग क्षेत्रात पंधरा दिवसांनी स्टाफ, कामगारांची करोना चाचणीचा निर्णय योग्य आहे; परंतु कामगार वर्गातून याला विरोध होत आहे. आम्हालाही आमची काळजी आहे. त्याअनुषंगाने आम्ही खबरदारी घेऊन कंपनी ते घर आणि घर ते कंपनी असाच प्रवास करत असल्याने दर पंधरा दिवसाला तपासणी बंद करा, अशी मागणी वाढू लागली आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष पिं.चिं. लघु उद्योग संघटना