इंदापूरच्या “त्या’ 22 गावांत मुबलक पाणी
रेडा – मागील पाच ते दहा वर्षांमध्ये इंदापूर तालुका पावसाने वगळला होता. त्यामुळे लिटरवर पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. हजारो हेक्टर क्षेत्र पडिक होते. मात्र मागील महिन्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दोन ते तीनवेळा पाऊस पाणी पडत असल्यामुळे नको रे बाबा पाऊस, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
इंदापूर तालुका हा समृद्ध तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातून दोन नद्या जात आहेत. त्यामध्ये नीरा नदी आहे. दुसऱ्या बाजूला भीमा नदीचा प्रवाह आहे. तरीदेखील दुष्काळी पट्टयातील 22 गावे पाण्यावाचून तीन पिढ्या होरपळत आहेत. यंदा परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर इंदापूर तालुक्यावर पावसाने डोळे वटारले असल्याची प्रचिती इंदापूर तालुक्यातील नागरिकांना येत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
उभी पिके काही भागात सडू लागली आहेत. गोठ्यामध्येच चारा द्यावा लागत आहे. दीपावलीची लगबग सुरू असताना सरी तास-दोन तास बरसत आहे. विंधन विहिर व बोअरला मुबलक पाणी वाढले आहे. त्यामुळे ओढे, नाले खळखळून वाहत आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांतील पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे.
शिवारात पाणीच पाणी –
इंदापूर तालुक्यातील बावडा, नरसिंहपूर, भोडणी, लाखेवाडी, निमसाखर, शेटफळ हवेली भागातील गावाकडून शेताकडे जाणारे जुने रस्ते चिखलाने माखले आहेत. शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे जुने पानंद रस्ते दर्जेदार करून द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पावसामुळे जनावरांचा चारा म्हणून शेतात केलेली पिके अधिकच्या पावसामुळे सडू लागली आहे. आगामी काळात पाऊस होऊन चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.