नवी दिल्ली- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभर त्यांना अभिवादन केले गेले. 1991 साली आजच्या दिवशी तमिळनाडूत पेरुम्बुदूर इथे एलटीटीई या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट घडवत राजीव गांधी यांची हत्या केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना ट्वीट संदेशाद्वारे आदरांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिवंगत राजीव गांधी यांना अभिवादन केले आहे.
राजीव गांधींनी देशातील दूरसंचार आणि संगणक क्षेत्राची पायाभरणी केली. ती आज महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या स्मृती दिनी दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ घेऊ या. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षाने या निमित्त जाहिरातींवर खर्च होणारा पैएसा स्थलांतरीतांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करताना “ते सच्चे देशभक्त, उदारमतवादी, देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारे नेते, आत्मविश्वासू आणि दूरदृष्टी असणारे दृष्टे होते.’ असे म्हटले आहे. एका अन्य ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी आपण सच्च्या देशभक्ताचे पुत्र असल्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ट्विटरद्वारे राजीव गांधी यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.