विनायक श्रीधर अभ्यंकर
या विश्वाला सदाचाराचा मार्ग शिकवणारे गुरू नानकदेव यांची आज 551वी जयंती. त्यांचे विचार आणि कार्याचा घेतलेला आढावा…
गुरू नानकदेव हे दोनच शब्द उच्चारल्या बरोबर डोळ्यांसामोर धीर गंभीर, राजबिंडा तेजोवलयांकीत छबी तरळू लागते. ईश्वर स्पर्शाचा हा देवदूतच. धर्माचरणाला पवित्र क्षात्रधर्माच्या कसोटीवर उतरवून नव्या जीवनाचे सारासार प्रज्ञेने मांडणारा महान द्रष्टा धर्मयोद्धा. जे सामर्थ्यवान असतात तेच दीनदुबळ्यांचे संरक्षण करून मानवतेची खऱ्या अर्थाने पूजा बांधतात ही शिकवण आद्य पातशाही गुरूदेव नानकसिंहांचीच.
हिंदुस्थानातील धर्मोपदेशकांच्या शिकवणीला आध्यात्माची गंभीर बैठक आहे. भक्तिमार्गाच्या आधाराने मानवाला जागृत करून समजाला सदाचारणास प्रवृत्त करणे हा त्यांचा मूलमंत्र. गुरू नानकदेव यांच्या कार्याला कर्मयोगाची व क्षात्रतेजाची सुंदर किनार आहे. परकीय आक्रमणात जखडलेल्या एतद्देशिय बांधवांना पुरुषार्थाची आठवण करून त्यांचे ठायी आत्मसन्मान जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले.
व्यवहाराच्या मोहपाशात न पडता सचोटीने मानवाला अंधश्रद्धा व धार्मिक गुलामीतून बंधमुक्त करण्यासाठी नानकदेव झटले. कर्मकांडात गुंतून पडल्यामुळे दिशाहीन झालेल्या समाजाला आपल्या मृदू वाणीने भवसागर तरून जाण्याचे उपाय सूचवणारे सुबुद्ध नावाडी म्हणजे गुरूदेव नानक.
हिंदुस्थानी संतांच्या जीवनात बऱ्याच ठिकाणी एकसूत्रता आढळते. भागवत धर्माचा प्रसार करताना तेजोभंग होऊन गलीतगात्र झालेल्या देशबांधवांचे क्षात्रतेज जागृत करण्याचे कार्य अनेक संतांनी केले.
नानकदेव यांनी त्यांच्या कालखंडात स्वतःचा प्रपंच दूर सारून राष्ट्राच्या उन्नतीसाठी समस्त मातृभूमीचाच विशाल संसार आपल्या शिरावर घेऊन तीर्थाटन केले. अंधश्रद्धा, अघोरी रूढी व दांभिक धर्मांधतेवर आपल्या सटीक, अमोध वाणीने प्रहार करीत मानवतेचे महत्त्व पटवून देणारे महान क्रांतिकारीच. साहित्यात रसाळ व अनमोल साहित्य खजिना समाजाला मार्गदर्शक म्हणून बोधामृत पाजणारे हे प्रज्ञावंत, धर्माला शाश्वत विचारांचे अनुष्ठान देणारे कर्मयोगीच. व्यावहारिक वैराग्याची जोड देत ईश्वरभक्ती बरोबरच जनसेवेचे कंकण बांधून जगन्नाथाचा रथ कुशलतेने हाकणारे समाजसारथी होत. केवळ पोथीनिष्ठ सामार्थ्याने नव्हे तर आत्मसाक्षात्कारानेच समाजाचा पाया मजबूत करता येतो म्हणून इंद्रियांना जिंकले व चराचरात व्यापून राहिलेले प्रेम वाटून दुःखाचे मूळ खणून काढावे हे तत्त्वज्ञान आपल्या कृतीतून मानवाचे ठायी उतरवणारे हे सामर्थ्यवान गुरू होत.
शरीर हेच शेत आहे. हे शेत नांगरणारा नांगर म्हणजे मन. ह्या शेताला मर्यादाशीलतेचे पाणी घालून त्यात प्रभू नामाचे बीज पेरावे. दुःखाची ढेकळे संतोषाच्या वखराने फोडावे. त्यातून सत्याचेच पीक वर्धीष्णू होते, अशी गुरूनानक यांची शिकवण.
माणूस हा माणूस आहे. प्रथम मानवता धर्म शिका. ही शिकवण देत नानकदेवांनी सर्वधर्मीय शिष्य जमविले. धर्माच्या नावाखाली मतलबासाठी झगडणारे देवाचेच काय कोणाचेच प्रेषित होऊ शकत नाहीत. खरा धर्म माणसाला आत्मतेज देऊन मोक्षाप्रत नेतो. कर्मकांडात व व्रतवैकल्यात अडकून पडणारा धर्म असूच शकत नाही, अशी त्यांची शिकवण. कष्टाच्या अन्नाला अमृताचा ओलावा असतो, तर पिळवणुकीच्या पक्वान्नाला गोडीच नसते, असा उपदेश सप्रमाण त्यांनी आपल्या शिष्यांना व अनुयायांना केला.
गुरूनानक लौकिक अर्थाने संसारापासून अलिप्त राहिले, परंतु त्यांनी उपदेश मात्र केला, प्रपंचात राहूनच ईश्वराला शोधा. शोधक दोन प्रकारचे असतात- ईश्वरदर्शनाची तीव्र व जातिवंत आस्था असलेले श्रद्धाळू, तर दुसरे पोटात स्वार्थ व ओठात परमार्थ भासवणारे. समग्र अस्तित्वाचा स्वामी असलेल्याची सेवा करण्यासाठी प्रत्येक कृती करणारा खरा साधक हाच श्रेष्ठ संसारिक होय.
गुरूदेव नानक म्हणत, मृत्यू हा नव्या जीवनाचे प्रवेशद्वार आहे. तेव्हा मृत्यूला न घाबरता सामोरे जा बंदे! भयमुक्त हो!
गरू नानकदेवांच्या जीवितकार्याला परिस्थितीसापेक्ष व परिस्थितीनिरपेक्ष ही परस्पर विरोधी अंगे आहेत. निरर्थक रूढींचे भंजन हे पिरस्थितीसापेक्ष तर ईश्वरभक्तीचे प्रवर्तन हे परिस्थितीनिरपेक्ष अंग होय. जोपर्यंत मानव बाह्य देखाव्यावर भूरळून राहील, शाश्वताचे हितकारक चिंतन सोडून अशाश्वताच्या आहारी गेलेला असेल तोपर्यंत त्याला आयुष्याचे मर्म उलगडले नाही. मानवाला नैतिकतेची व प्रखर राष्ट्रवादाची शिकवण देत राहणे गरजेचे आहे. हे गुरू नानकदेवांचे पाचशे वर्षांपूर्वीचे विचार आजही प्रेरक व क्रांतिकारक आहेत. असे थोर तत्त्वज्ञ व बलोपासक आद्य पातशाही गुरू नानकदेव यांना त्यांच्या 551व्या जयंतीनिमित्त कोटी प्रणाम.