पुसेगावमध्ये आज होणार प्रारंभ, सर्व शाळांना स्थानिक प्रजातीची रोपे पुरविणार
सातारा – येथील हिरवाई संस्थेतर्फे खटाव तालुक्यातील शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करून यावर्षीच्या पावसाळ्यातील वनमहोत्सवाची मोहीम आखण्यात आली आहे. त्यासाठी सर्व शाळांना स्थानिक प्रजातीची रोपे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग व पुसेगावचे श्री सेवागिरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार असून मोहिमेचा प्रारंभ उद्या 6 जून रोजी पुसेगाव येथे होणार आहे.
शहरातील सदरबझार परिसरात तीन एकर पडीक जमिनीवर तीन हजार झाडे जगवून “हिरवाई’ विकसित केल्यानंतर गेल्या वीस वर्षांत संस्थेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाची वनमहोत्सव ही विशेष मोहीम सुरू होते. दरवर्षी पाच ते सहा हजार रोपांचे वाटप करून डोंगर, देवराया, शाळा, संस्थांच्या परिसरातील जागा, शहरातील रिकाम्या जागा, रस्त्याच्या दुतर्फा जागा, ग्रामपंचायतींच्या जागा अशा ठिकाणी झाडे लावून संवर्धन केले जाते. अशा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धन झाले आहे, अशी माहिती हिरवाई संस्थेच्या संस्थापिका प्रा. संध्या चौगुले यांनी दिली.
यावर्षी खटाव तालुक्यातील सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी मोफत रोपे पुरवून संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गरज भासल्यास प्रबोधनात्मक कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून खटाव तालुक्यातील या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या दि. 6 जून रोजी सकाळी नऊ वाजता पुसेगावच्या श्री सेवागिरी विद्यालयात होणार आहे. तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. सदरबझारमधील हिरवाई प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून विविध पर्याणपूरक तसेच सामाजिक उपक्रम आखले जातात. त्यामध्ये शाळा,महाविद्यालयातील मुले, युवावर्ग तसेच महिलांचा सहभाग घेतला जातो.
दरवर्षी कातकरी वस्तीतील मुलांची दिवाळी साजरी केली जाते. शैक्षणिक उपक्रमातून शैक्षणिक साहित्य देऊन उपेक्षित वर्गातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होतात. झोपडपट्टी व कष्टकरी वर्गातील मुलांसाठी बिनभिंतीची शाळा उपक्रम राबविला जातो. पर्यावरण जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने तज्ज्ञांची व्याख्याने, निसर्ग सहली, निसर्ग प्रदर्शने घेतली जातात. निसर्ग प्रदर्शनात विशेषतः मुले, महिलांना सामावून घेत पर्यावरणाची माहिती पोहचविण्याच्या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो. या साऱ्या उपक्रमांची सुरवात वनमहोत्सवाने होते. हा वनमहोत्सव खटाव तालुक्यात होत आहे. मात्र, जिल्ह्याच्या इतर भागांतही वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी संस्थेच्या वतीने लक्ष देण्यात येणार आहे, असे प्रा. चौगुले यांनी सांगितले.