दत्तात्रय आंबुलकर
राजस्थानच्या रण-प्रदेशातील अधिकांश गावे ही रखरखत्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर वसलेली आहेत. या गावांमध्ये हिरवळीपासून पाण्यापर्यंतच्या साऱ्याच वस्तूंचा अभाव असतो, या साऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीवर राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्याच्या पिपलांत्री या गावचे हिरवळयुक्त चित्र विशेष उल्लेखनीय ठरते.
राष्ट्रीय स्तरावरील आदर्श ग्राम, निर्मल गाव, पर्यटन ग्राम, जल ग्राम, वृक्ष ग्राम व कया ग्राम इ. विविध पुरस्कार पिपलांत्री गावाने मिळविले आहेत. या पुरस्कारांची पार्श्वभूमी सांगायची झाल्यास सुमारे 5 हजार लोकसंख्या असणाऱ्या पिपलांत्री या गावी बदल आणि परिवर्तनाची सुरुवात 2005 मध्ये झाली. त्यावेळी गावचे सरपंच होते शामसुंदर पालीवाल व भरमसाठ खाणकाम करून मार्बलचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून फार मोठ्या प्रमाणात खाणकाम, खोदकाम, वृक्षतोड इ. झाल्यामुळे आधीच रखरखीत असणाऱ्या त्या परिसरात शुष्कपणा सर्वत्र वाढत होता. पर्यावरणापासून पाण्यापर्यंत सर्वांवर विपरीत परिणाम करणाऱ्या या निसर्गलुटीच्या विरोधात 15 वर्षांपूर्वी आवाज उठविला तो गावचे सरपंच शामसुंदर पालीवाल यांनी. गाव आणि परिसरातील संगमरवरी खाणींच्या कामाला पायबंद घालतानाच परिसरातील नष्ट झालेली वृक्षराजी व हिरवळ पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पालीवाल यांनी पिपलांत्रीच्या गावकऱ्यांना साद घातली व त्यांना आपले प्रयत्न आणि पुढाकारांची समर्थ साथ दिली.
या प्रयत्नांच्या सुरुवातीला व पहिल्या टप्प्यात शामसुंदर यांनी गावकऱ्यांना पाणी आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व आणि महात्म्य समजावून सांगून त्यासाठी श्रमदानासह काम करण्यास प्रवृत्त केले. याच्याच जोडीला त्यांनी पिपलांत्री गाव आणि पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन केले व करवून घेतले. हे काम सातत्याने केल्याने गावचे सारे चित्र बदलत गेले. सुरुवातीला अवैध खाणकामावर प्रतिबंध घालून त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यावर त्याच सुमारास वृक्षलागवड करण्याचे काम पिपलांत्रीच्या गावकऱ्यांनी केले. त्यामुळे रखरखीत अशा त्या परिसरात वृक्षराजीसह हिरवळ साकारली व बहरू पण लागली. खाणकाम कमी झाल्याने डोंगराळ जमिनीची धूप थांबली व झाडांखालची माती शाबूत राहिल्याने झाडांची जोपासना चांगली होऊ लागली.
वृक्षलागवडीला पाण्याची साथ मिळणे फार गरजेचे होते. राजस्थानच्या त्या डोंगराळ भागात पाण्याचे दुर्भिक्ष कायमस्वरूपी असायचे. यावर तोडगा म्हणून पिपलांत्रीचे सरपंच शामसुंदर यांनी यापूर्वी गावठाणाजवळील अनधिकृत दगड खाणींचा उपयोग पावसाळी पाण्याच्या साठवणुकीसाठी मोठ्या कल्पक व परिणामकारक पद्धतीने करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या पुढाकार आणि प्रयत्नांमुळे गावाजवळील हिरवळ-झाडे एवढेच नव्हे तर गुराढोरांच्या पाण्याची समस्या नेहमीसाठी निकाली निघाली.
पिपलांत्रीच्या या उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यात गाव आणि गावकऱ्यांनी जनजागृतीपासून जलजागृती साध्य करण्यासाठी जलसंरक्षण, ग्रामस्वच्छता, बालिका शिक्षण, आरोग्य रक्षण, आर्थिक स्थिरतेसह सामाजिक सुरक्षा इ. उपक्रम यशस्वीपणे राबविले. या गावात मुलींच्या जन्माचेही स्वागत केले जाते. गेली 15 वर्षे पिपलांत्रीमध्ये कुणाकडे मुलीचा जन्म झाल्यास गाव परिसरात 111 वृक्ष लागवडीसह नवागत मुलींच्या नावे 21 हजार रुपयांची बॅंकेत ठेव ठेवण्यात येते. यातूनच पिपलांत्रीने विविध पुरस्कारांसह प्रशंसनीय काम केले आहे.