चेन्नई – दक्षिण भारतातील काही मंदिरांमध्ये महिलांच्या प्रवेशावरून नेहमीच वाद होतो. शबरीमला येथील मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आता महिलांना प्रवेश नाकारण्याच्या घटना काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मात्र चेन्नईतून आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. मात्र या घटनेनंतर येथील मंत्र्यांनी केलेल्या कृतीमुळे या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
तामिळनाडूतील ममल्लापुरम येथे राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी स्वत:ला आणि कुटुंबीयांना कांचीपूरमच्या मंदिरात अन्नदान कार्यक्रमावेळी अपमानित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या महिलेला मंदिरात जेवणापासून रोखण्यात आले. इतकचं नाही तर महिलेला मारहाण झाली कारण ती नरिकुराव समुदायातून होती.
महिलेने म्हटलं होतं की, मंदिरात मला सगळ्यात शेवटी बसवण्यात आले. जेवण वाढण्यापूर्वी मंदिराचे काही कार्यकर्ते आले आणि तिथून निघून जाण्यास सांगितले. या महिलेने विरोध केल्यावर महिलेला मारहाण करण्यात आली. ही महिला अनुसुचित जातीतील असल्याने महिलेसोबत अशी वर्तवणूक केल्याची चर्चा सर्वत्र पसरली. महिलेने मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप लावले.
दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मंत्री पी.के. शेखर बाबू यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी अन्नदान कायक्रमासाठी महिलेसह अधिकाऱ्यांना मंदिरात बोलवलं. यावेळी त्यांनी पधाधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. तसेच महिलेसोबत जेवण केलं. सर्वांना एकसमान वागणूक द्या, अशा सूचनाही शेखर बाबू यांनी यावेळी दिल्या.