पुणे, दि. 18 -“शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कुटुंब उभं करून समाज बांधणीचे मोठे काम दिशा परिवाराकडून होत आहे. कोणताही जातीभेद न ठेवता राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीद्वारे मदतीचे काम होत असून, एक प्रकारे महाराष्ट्र एकसंध ठेवण्याचे काम दिशा परिवार करीत आहे,’ असे गौरवोद्गार मराठवाडा मित्र मंडळ या शैक्षणिक संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी काढले.
दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 16 वा शिष्यवृत्ती प्रदान समारंभ घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे रविवारी उत्साहात पार पडला. याप्रसंगी “दिशा परिवार आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ ऍड. प्रताप परदेशी आणि शिरीष मोहिते यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सोहळ्यास ज्येष्ठ संपादक संजय आवटे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विक्रम गायकवाड, दै. “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच दिशा परिवारचे अध्यक्ष माणिकराव गोते, खजिनदार अरुण कुलकर्णी, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, महेंद्र खंडेलवाल, पौर्णिमा जानोरकर, नंदकिशोर रोजेकर यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाऊसाहेब जाधव म्हणाले, “दिशा परिवारचे कार्य विस्तारले आहे. संस्थेकडून सर्व पारदर्शी कामे होत आहे. ही संस्था पुढे नेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असून, त्यासाठी तितक्याच मेहनतीची गरज आहे. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही संस्था आणखी पुढे जाईल, असा विश्वास आहे.’
संजय आवटे म्हणाले, “प्रत्येक माणसांकडे चांगुलपणा असतो. सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना माणसातील चांगुलपणाला आवाहन देत चांगली माणसं उभी करण्याचे काम या निमित्ताने होत आहे. दिशा परिवार विद्यार्थ्यांमध्ये “उमेद’ निर्माण करीत असून हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीतून दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम दिशा परिवार करीत आहे.’
बी. एल. स्वामी म्हणाले, “दिशा परिवाराचे राजाभाऊ चव्हाण यांचे कार्य शब्दात मांडणे अवघड आहे. या परिवाराकडून सुसंस्कृत पिढी, आदर्श आणि सुजाण नागरिक घडत आहे, हे मोठे सामाजिक परिवर्तन म्हणावे लागेल. माजी विद्यार्थी, कार्यकर्तेही आता संस्थेत विश्वस्त होत आहे, हे केवळ दिशा परिवारात घडू शकतं. दान देण्याची मानसिकता असेल तर दाते होऊ शकतील. विद्यार्थ्यांना मदत केल्यानंतर आमच्या विचारांची श्रीमंती वाढली आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ऍड. परदेशी म्हणाले, “दिशा परिवारच्या माध्यमातून मदत करणारे व मदत घेणारे यांच्यातील अंतर कमी होत असून, आता त्यांच्यातील मनातील अंतरही कमी होत आहे. हे कार्य पुढे नेण्यासाठी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.’
डॉ. विक्रम गायकवाड यांनी “संस्थेकडून पारदर्शी कारभार असून आतापर्यंत साडेचार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. दात्यांमुळेच ही संस्था उभी राहिली आहे,’ असे मत व्यक्त केले.
विद्यार्थी आणि दात्यांच्या भावना…
“दिशा परिवारने आम्हांला शिक्षणासाठी केवळ मदत केली नाही; तर व्यक्तिमत्व विकासाचे धडेही दिले आहेत. आमच्यात आत्मविश्वास निर्माण करत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची दिशा दाखवली आहे,’ अशी भावना शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर, शिष्यवृत्ती देणारे दानशूर व्यक्ती म्हणाले,”आम्ही गरजू मुलांना मदत करीत असून, त्याचा आनंद अवर्णनीय आहे.’
दैनिक “प्रभात’ची परंपरा कायम…
दैनिक “प्रभात’कडून यंदाही काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. “प्रभात’चे संस्थापक तथा पत्रमहर्षि वा. रा. कोठारी यांच्यापासून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी दिशा परिवारची प्रेरणा मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपासून “प्रभात’कडून यंदाही 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीद्वारे मदत करण्यात आली आहे. यापुढेही गरजूंना मदत करण्यासाठी दैनिक “प्रभात’ कटिबद्ध आहे, असे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी यावेळी सांगितले.
ऍड. परदेशी, मोहितेंकडून शिष्यवृत्तीची घोषणा
कार्यक्रमात ऍड. प्रताप परदेशी आणि शिरीष मोहिते यांना रोख 11 हजार, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ऍड. परदेशी आणि मोहिते यांनी पुरस्काराच्या रकमेत वाढ करत दोघांनी दिशा परिवारास प्रत्येकी 25 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी धनादेश देण्याची घोषणा केली.