पुणे – वस्त्रोद्योग धोरणांतर्गत राज्यात रेशीम उद्योगाबाबत जनजागृती करण्यासाठी सहकार खात्याच्या वतीने महारेशीम अभियान -2020 चे आयोजन केले आहे. राज्यभरात 7 ते 21 जानेवारी या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित रोजगाराची मोठी क्षमता असलेला उद्योग आहे. महाराष्ट्रातील हवामान या उद्योगास पोषक असल्याने रेशीम उद्योगाला राज्यात मोठा वाव आहे. या उद्योगातून रोजगार निर्मिती होऊन मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.
रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिद्धी होऊन, हा उद्योग लोकाभिमूख व्हावा, याकरिता पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) गतवर्षी राज्यात महारेशीम अभियान राबविले.
राज्यातील रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, याकरिता प्रशिक्षण व मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता 7 ते 21 जानेवारी या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे.