मुंबई – रशिया-युक्रेन या युद्धामुळे भारताला गहू निर्यात करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि जागतिक निर्यात पेठेत 25% गहू रशिया आणि युक्रेनमधून येत असतो.
आता जागतिक पातळीवरून रशियावर निर्बंध घालण्यात आल्यामुळे रशिया गव्हाची निर्यात करू शकणार नाही. त्याचबरोबर युद्धात अडकल्यामुळे युक्रेननही गव्हाची निर्यात करू शकणार नाही.
शिवाय काळ्या समुद्रातून वाहतूक होऊ शकणार नसल्यामुळे युक्रेनने गहू निर्यात करण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त साठा असलेला भारत गव्हाची निर्यात करू शकणार आहे.
भारताकडे सध्या 2 कोटी 42 लाख इतका गहू पडून आहे. भारताच्या गरजेच्या तो दुप्पट आहे. त्यामुळे यातील काही गहू भारत निर्यात करू शकेल. इजिप्त, तुर्कस्तान, बांग्लादेश रशियाकडून मोठ्या प्रमाणात गहू आयात करतात. त्या देशांना भारत सहज निर्यात करू शकणार आहे. केवळ इजिप्त वर्षाला चार अब्ज डॉलरचा गहू खरेदी करतो. त्या देशाला हा गहू पुरविला जाऊ शकतो असे अधिकाऱ्यानी सांगितले.