लॉकडाऊनच्या काळात 5 लाख कोटींचे नुकसान
नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्राची मोठी हानी झाली असून या क्षेत्राचे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.
भारतीय उद्योग महासंघाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, यातील जवळजवळ 50 टक्के नुकसान हे औपचारिक क्षेत्रातील कंपन्यांचे झाले आहे. यामुळे या क्षेत्राला अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी लघू आणि दीर्घ पल्ल्याच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा मोठा रोजगार निर्माण करणाऱ्या या क्षेत्राच्या मंदीमुळे भयंकर बेकारी निर्माण होऊ शकते.
शिथिलीकरणानंतर भारतातील मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढल्यामुळे देशात आणि परदेशात प्रवास आणि पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढली होती. यामुळे हा उद्योग चांगलाच वाढला होता. मात्र या क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. अगोदर ऑक्टोबरनंतर या क्षेत्राची परिस्थिती सुधारेल असे समजले जात होते. मात्र, सध्या या क्षेत्रातील महसूल केवळ 20 टक्क्यांवर आहे. त्याचबरोबर आगामी एक वर्ष तरी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यासाठी या क्षेत्राने सवलतींची मागणी केली आहे.
कर्ज फेररचना पुरेशी नाही
केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बॅंकेने सहा महिने कर्जाचा हप्ता न भरण्याची सवलत दिली होती. ती सवलत प्रदीर्घ काळ चालू ठेवणे शक्य नसल्यामुळे आता रिझर्व्ह बॅंकेने काही उद्योगांना कर्ज फेररचनेची मुभा दिली आहे. याचा या क्षेत्रातील काही कंपन्यांना फायदा होणार आहे. मात्र हे क्षेत्र पूर्णपणे पुनरुज्जीवित होण्यासाठी एवढे पुरेसे नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.