पुणे – महापारेषण कंपनीच्या लोणीकंद व चाकण या दोन अतिउच्च दाबाच्या 400 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पाच ठिकाणी ट्रिपींग आले होते. या तांत्रिक बिघाडामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच चाकण, वाघोली, लोणीकंद आदी भागातील 24 लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
यापैकी 80 टक्के भागात सकाळी 8.30 ते 12 वाजेपर्यंत व उर्वरित 20 टक्के भागात दुपारी 3 वाजेपर्यंत वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. दरम्यान वीज नसल्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्यावर सुध्दा परिणाम झाला.
महापारेषणच्या लोणीकंद ते चाकण आणि चाकण ते तळेगाव या दोन्ही टॉवर लाईनच्या एकूण 5 सर्कीटमध्ये दाट धुके व दव यांचा परिणाम झाल्याने तांत्रिक बिघाड झाला. परिणामी महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या 400 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. या उपकेंद्रांतून महावितरणच्या तब्बल 189 उपकेंद्रांना होणार वीजपुरवठा देखील ठप्प झाला. त्यामुळे पुणे शहरातील सुमारे 15 लाख 13 हजार, पिंपरी चिंचवड शहरातील 7 लाख 25 हजार तसेच लोणीकंद, वाघोली, चाकण या ग्रामीण परिसरातील सुमारे 1 लाख 80 हजार अशा एकूण 24 लाख 18 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
दरम्यान वीजपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर महावितरण व महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपात्कालीन नियोजन केले.
पुणे शहर अंतर्गत रास्तापेठ, बंडगार्डन, पर्वती, कोथरूड, नगररोड, शिवाजीनगर विभागामध्ये पर्यायी व्यवस्थेतून सकाळी 11.30 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर पद्मावती विभागामध्ये 1 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत पिंपरी विभागामध्ये 12 वाजेपर्यंत संपूर्ण भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला.
ग्रामीण भागामध्ये लोणीकंद व वाघोली परिसरातील वीजपुरवठा सकाळी9.45 च्या सुमारास सुरळीत करण्यात आला. तर महत्वाच्या चाकण एमआयडीसीमधील वीजपुरवठा देखील दुपारी 12.15 वाजता सुरु करण्यात आला. दरम्यान वीज गेल्यानंतर महावितरणकडून याबाबतची माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे देण्यात आली.
पुणे : पूर्ण शहराचा वीज पुरवठा विस्कळीत
जॉब इंटरव्ह्युव करावे लागले स्थगित
वीज गायब झाल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाली. यामध्ये आयटी क्षेत्रातील काही कंपन्यांनी ऑनलाईन मुलाखतीचे आयोजन केले होते. महावितरणने 11 वाजेपर्यंत वीज येईल, असे कळविले होते. मात्र वीजवेळेत येण्याची खात्री नसल्याने या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या, अशी माहिती एका आयटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.