विश्रांतवाडी – पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पाहिलेली स्वप्नं अमृत महोत्सवी वर्षांत पूर्ण होत आहेत. ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत पाइपलाइनद्वारे पिण्याचे पाणी ही त्यातीलच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासाठी स्वतंत्र मंत्रालय काम करीत असून देशात सर्वत्र पाणी योजनेचे मोठे कामे सुरू आहे. मोदी यांचे पाणीपुरवठ्याबाबतचे स्वप्न पूर्ण करण्यात पुण्यातील नगरसेवकांचेही मोलाचे योगदान राहणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विमाननगर-सोमनाथनगरचे (प्रभाग क्र. 3) नगरसेवक राहुल (आप्पा) भंडारे यांच्या अथक प्रयत्नातून विमाननगर येथे 45 लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बांधण्यात येत आहेत, याचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक राहुल (आप्पा) भंडारे, अनिल टिंगरे, योगेश मुळीक, तुषार पाटील, नगरसेविका श्वेता खोसे-गलांडे, मुक्ता जगताप, मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष खांदवे-पाटील, मोहनराव शिंदे-सरकार, महेंद्र गलांडे, संतोष राजगुरू, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, समान पाणी पुरवठा योजना, मेट्रो, बससेवा, मेडिकल कॉलेज, 900 बेडस्चे रुग्णालय या सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प शहरात सुरू आहेत. नगरसेवकांकडूनही प्रभागात विकासकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. याशिवाय नियोजित कामे नगरसेवकांनी पाठपुरावा करून येत्या सहा महिन्यांत पूर्ण करावीत अन्यथा निवडणुका लागल्यानंतर ही कामे कागदावरच राहतील याचा काही उपयोग नाही, अशी सूचनाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली.
यावेळी माजी आमदार, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संजय (नाना) गवळी, दीपक चव्हाण, संतोष म्हस्के, अनमोल सांव, धनंजय भिंगारदीवे, अभिषेक गाडे, निलेश गरुड, निखिल भंडारे, अर्जुन कांबळे, योगेश म्हस्के, गौतम झेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष खांदवे-पाटील यांनी प्रास्ताविक केले.
विमाननगरसह आजूबाजूच्या परिसरात अनेक बहुमजली गृहनिर्माण सोसायट्या आहेत. सध्या त्यांना पाणीपुरवठा कमी होत असल्याने खासगी टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. त्यासाठी त्यांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत; परंतु या पाण्याच्या दोन टाक्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर विमाननगर, संजयपार्क, साकोरेनगर, पुरू सोसायटी, राजीवनगर, यमुनानगर, म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांना उच्च दाबाने व मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. टाक्यांचे काम पूर्ण होण्यास साधारण आठ महिने लागणार आहे. दररोज सुमारे दोन लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी मिळणार असून संपूर्ण प्रभाग टॅंकरमुक्त होणार आहे.
– राहुल (आप्पा) भंडारे, नगरसेवक