अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार. यशस्वी माणसं वेगळी नसतात, फक्त ती वेगळा विचार करतात म्हणून ती यशाचे शिखरे सहज पार करतात. यश सहज मिळत नसले, तरी तुमचे ध्येय, जिद्द तुम्हाला मोठं बनवतेच.. अगदी सामान्य माणूस म्हणून जगलेली लोक आपण आज एका उंचीवर गेलेली पाहतो, त्यातलेलंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.श्री ठाणेदार आणि त्यांचा सामन्यातून असामान्यत्वाकडे झालेला प्रवास कसा आहे हे जाणून घेऊ..”ही श्रीं ची इच्छा’, या श्री ठाणेदार यांच्या पुस्तकातून यांचे शब्दांकन केले आहे शोभा बोन्द्रे यांनी.. “श्री ” एका छोट्या गावात पंचावन्न टक्के मिळवून पास होणारा साधारण मुलगा..घरची परिस्थिती अगदी बेताची,मॅट्रिक ला पंचावन्न टक्के मिळाल्यानंतर सामान्य बुद्धीचा हा ठपका बसला अन श्री ला जाणवले त्याला अजून खूप मेहनतीची जोड द्यावी लागणार आहे.. खूप मेहनत करुनं बीएस्सीला प्रथम वर्ग मिळवला आणि तो पुन्हा हुशार विद्यार्थी म्हणून गणला जाऊ लागला… त्यानंतर अमेरिकेला जाण्यासाठी लागणाऱ्या व्हीसा मिळवतानाही आलेल्या अडचणी आणि त्यासाठीची पाठपुरावा वाचताना आपल्यासारखी माणसं आश्चर्यचकित होतात, खरं तर तिथूनच त्यांच्या चिकाटीची परीक्षा चालू होते.
अमेरिका तिथले शिक्षण, ते वातावरण, प्रत्येक गोष्टीत येणाऱ्या अडचणी. एक छोटी मोडकळीला आलेली कंपनी विकत घेतल्यानंतर श्री चा मालक म्हणून तेथील प्रवास चालू होतो. वयात आल्यानंतर लग्न हा महत्वाचा विषय पण अमेरिकेत असल्यामुळे कोणतीही मुलगी लग्नासाठी तयार होईना. त्यातच एक साजेशी मुलगी पाहून लग्न होते, दोन गोजिरवाण्या मुलांसोबत श्रीचा अमेरिकेचा प्रवास चालू असतो, अन त्यातच एक दिवस त्यांची पत्नी आत्महत्या करते अन श्री कोलमडून पडतो. नातेवाईक, मित्र यासाठी श्रीला जबाबदार धरत त्याला वाळीत टाकतात, पण तरीही तो जिद्द नं सोडता नेटाने एकटा लढत राहतो.
मुलांचे माता अन पिता दोन्ही जबादारी श्री छान निभावतो. नंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीची साथ ही तितकीच मोलाची ठरते. पुढे अनेक अडचणींचा सामना करत श्री यशस्वी कसा होतो हे तुम्हाला पुस्तकं वाचूनच कळेल. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्याला वळण लावण्यासाठी किती पुरेशा होतात याचे उदाहरणं म्हणजे हे पुस्तकं. पुस्तक खूप छान आहे नक्की वाचा.
तोपर्यंत “प्रभात-अस्मिता’शी जोडलेले रहा. धन्यवाद.
– मनिषा संदीप