अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार
माणसाला काय हवे आहे? अशी कोणती गोष्ट त्याला समाधान देते? कशासाठी तो अविरत धडपड करत असतो? सुखाची व्याख्या काय त्याच्या लेखी.. असे अनेक प्रश्न पडतात हे पुस्तकं वाचताना…आणि त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी पूर्ण पुस्तकं वाचावे लागते, हीच खासियत… अॅडम ही रत्नाकर मतकरी यांची कादंबरी.. नेहमीच गूढ कथा लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेखकाने या कादंबरीच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयावर प्रकाश टाकला आहे, जो विषय सर्वसामान्य माणूस सहज पचनी पाडू शकत नाही अन म्हणूनच कदाचित या कादंबरीवर अनेक प्रकारे टीका होत गेली.
अॅडम ही एका सामान्य माणसाची कथा आहे.. वरद नावाच्या तरुणाभोवती फिरणारी कादंबरी त्याच्या तारुण्याभोवतीसुद्धा फिरते..घरात जेव्हा त्याच्या आईला चौथ्यांदा मुलं होणार हे कळते. तेव्हा नकळत त्याच्या मनात अनेक प्रश्न पडत जातात अन याच उत्सुकते पोटी स्त्रीयांनबद्दल आकर्षण निर्माण होत जाते. अन नकळत्या वयात चुका घडतात, अनुभव घेतले जातात. पण त्यात फारसे भावनिक न होता निव्वळ जिज्ञासेपोटी जी कृत्ये घडत जातात. काही ठिकाणी तो अनेक स्त्रियाच्या वासनेला बळी पडत जातो, तर काही ठिकाणी त्याच्या शरीराची गरज भगवण्यासाठी तो अनेक संबंध ठेवतो. यातच पुढे तो खरा प्रेमात पडतो. आणि पुढे तो तिच्याकडून फसला जातो. ती सर्व सामान, पैसा अन त्याच्या खऱ्या प्रेमाचा बळी घेऊन घेऊन निघून जाते. नंतर प्रेमा नावाची एक हतबल नवऱ्याने छळ करून टाकलेली एक स्त्री वरदच्या आयुष्यात येते. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला वरद तिला आसरा देतो, मुलांना सांभाळतो. अनेक गुंतागुंती घडत जातात. खरंच प्रत्येकाला काय मिळवायचे असते? असे अनेक प्रश्न या नायकाला पडतात.
ऑफिसचे कटकारस्थान, कुठे राजकारण, कधी पत्नीपासून दूर राहण्यासाठी तिच्यामुळे झालेली बदनामी दूर करण्यासाठी अनेक नोकऱ्याही तो बदलत जातो. वरदच्या आयुष्याची वाताहत होत जाते. त्यात निर्मला भेटते खऱ्या अर्थाने तिच्याकडे जाण्यास निघतो पण… पुढे तुम्ही पुस्तकात वाचू शकाल. लेखकाने नैसर्गिक क्रिया मांडल्या असल्या, तरी कुठे तरी वाचकांलासुद्धा डोळसपणे अन धाडसीपणे लेखकाला काय अभिप्रेत आहे समजून घ्यावे लागणार आहे. बेधडक बिनधास्त लिखाण बोल्ड नक्कीच वाटते. पण सरते शेवटी कथेची बाजू लक्षात येत जाते, तसतसे झालेले लिखाण थोड्या अंशी समजून घेतले जाते..कुठे तरी तारुण्यातील आकर्षण अन त्यातून घडणारे नाट्य समजून घेता आले, तरच या कादंबरीचा बोल्डपणा कमी करता येईल. मतकरी हे खूप मोठे साहित्यिक, नाटककार, बालसाहित्यकार अन गूढ कथा लेखक म्हणून ओळखले जातात. अनेक पुरस्कराचे मानकरी असलेल्या सुप्रसिद्ध लेखकाची प्रत्येकालाच ओळख असल्यामुळे मी नव्याने काय बोलणार. वेगळ्या धाटणीचे पुस्तकं वाचा, समजून घ्या.. नवीन पुस्तकाचा अभिप्राय घेऊन नक्कीच पुन्हा भेटेन तोपर्यंत
धन्यवाद…
– मनीषा संदीप