एक फार जुनी आठवण या विषयाच्या निवडीमुळे माझ्या मनात जागी झाली. पाचवीत शाळेतल्या सहलीला गेलेलो असताना एका मुलानं मला मळमळत होतं म्हणून आवळ्याची सुपारी दिली. आणि त्याच क्षणानंतर तो माझा मित्र झाला तो आजतागायत. गेल्या चार दशकात अक्षरशः शेकडो उलथापालथी आमच्या दोघांच्या आयुष्यात झाल्या. शिक्षण, करिअर, लग्न, मुलं, आई-वडिलांचे मृत्यू, आजारपणं आर्थिक ओढाताण अक्षरशः अगणित! पण कृतज्ञतेखातर मी केलेली मैत्री नंतर अजून टिकून आहे.
खरं तर ही घटना आजच्या भाषेत फक्त “थॅंक्स’ म्हणण्याची आहे. माझा कॉलेजातला एक सहाध्यायी तर चहा पिताना म्हणायचा- “हा चहा पिऊन होईपर्यंत मी तुझे उपकार विसरणार नाही’ पण त्यामुळेच तो मित्र नाही होऊ शकला.
कृतज्ञता ही प्रेमाची धाकटी बहीण आहे असं मला वाटतं. अनेक लग्न दाखवून, कांदेपोहे पद्धतीनं म्हणजे प्रेम नसताना होतात. नंतर मुलंबाळंही होतात पण त्यावेळी आपल्या मनात जोडीदाराबाबत जी भावना असते ती आपुलकीची, स्नेहाची, जवळकीची किंवा कृतज्ञतेची.
प्रेम नसलं तरी कृतज्ञता असू शकते, ती असायलाच हवी. साधी जनावरंही भाकरी देणाऱ्याशी कृतज्ञ राहतात, त्याच्या हितासाठी झगडतात, क्वचित प्राणही देतात. मग आपण तर विचार करणारी माणसं आहोत. आपण काही कृतज्ञता दाखवू शकत नाही का? त्यासाठी कायदे का करावे लागतात? ज्या आई-वडिलांनी लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, लग्न झाल्यावर मुलं सांभाळली, मुलं लहान असताना आपल्या आवडी बाजूला ठेवून त्यांच्या आवडी, आजारपणं हे सगळं केलं. त्यांना काम संपल्यावर वृद्धाश्रमात टाकताना मुलांना काहीच कसं वाटत नाही? मग त्यांनाही त्यांच्या मुलांनी म्हातारपणी घराबाहेर काढलं तर? आली कुठून ही कृतघ्नता?
“नटसम्राट’ नाटक तर विचार करणाऱ्या प्रत्येकालाच आठवेल. घरदार वाटून टाकल्यावर मुलगा आणि मुलगी या दोघांनी घराबाहेर काढलेल्या म्हाताऱ्याला सांभाळतो कोण? तर रस्त्यावर बूटपॉलिश करणारा माणूस. कृतज्ञता तर दिवसाच्या प्रत्येकक्षणी असायला पाहिजे. मदत करून आपण उपकार करत नसतो तर आपल्यावर अनेकदा ज्या समाजानं उपकार करून ठेवले आहेत जाणता, अजाणता ते फेडत असतो. मला तर एका माणसानं सांगितलंच- “माझे उपकार फेडशील- हे खरं ते कर्तव्यच आहे. पण मी केले तसे उपकार किंवा खरं तर निरपेक्ष मदत दुसऱ्याला कर. हे खरं उपकार फेडणं- ही कृतज्ञता-‘
चांगुलपणाचं हे चक्र फिरतच राहिलं पाहिजे. नाहीतर जग चालणार तरी कसं? हिंदू धर्मात सांगितलेली मातृ-पितृ ऋण, आचार्यऋण आणि देवऋण ही तर परतफेड केल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही म्हणे? हिंदूधर्मात पूर्वी सूर्याला अर्घ्य देत, झोपून उठल्यावर जमिनीला पाय लावण्यापूर्वी “पादस्पर्शं क्षमस्वमे’ म्हणत. आता तर सूर्यावर थुंकणारी माणसं आहेत, जमिनीवर पाय आपटून चालणारी, सिगारेट विझवणारी माणसं समोर आहेत. आपण कृतज्ञता विसरत चाललोय असं दिसतं.
माझ्याशी बोलताना एका मानसतज्ज्ञांनी हा प्रयोग सांगितला होता. राजे ज्यांची मदत झाली त्यांची नावं आणि काय मदत झाली ते वहीत लिहून ठेवायचं. तुम्हीही हा प्रयोग करून बघा. चार-पाच वर्षांनंतर ती वही परत वाचताना मजा तर वाटतेय पण ज्यांच्यावर राग असेल तोही निघून जातो. आपल्याला त्यांनी कळत नकळत खूप मदत केलेली असते.
मग त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायला नको का? बघा विचार करून- आणि शक्य तर लगेचच लिहायलाही सुरुवात करा- बघा मग आनंदाचं दार दूर नाही!
सहजानंद