पुणे – ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला असताना आता ढगाळ हवामानाचे संकटही राज्यातील द्राक्षबागांसह अन्य पिकांवर घोंघावू लागले आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीतून आता कुठे शेतकरी सावरत असताना 4 डिसेंबरपर्यंत ढगाळ हवामान राहणार आहे. राज्याच्या विविध भागांत हलक्या सरी होण्याची शक्यता वर्तविली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह राज्याच्या बहुतांश भागावर ढगाळ वातावरण आहे. येत्या 3 ते 4 डिसेंबरपर्यंत वातावरण ढगाळच राहण्याची, तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके व हजारो हेक्टरवरील द्राक्षबागाही उध्वस्त झाल्या. आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे या बागा संकटात सापडण्याची शक्यता बळावली आहे.
याशिवाय डाळिंब, बाजरी, मका, ज्वारी पिकांनाही ढगाळ हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असताना आता पुन्हा ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे नवी आव्हाने उभी ठाकली आहेत.
द्राक्षमणी तडकण्यास सुरुवात
राज्यात नाशिक, सांगलीसह पुण्यातील नारायणगाव परिसरात थॉमसन, शरद, फ्लेम, सोनाका, फनटासी, क्रिमसन यांसारख्या अनेक द्राक्षजाती लागवडीखाली आहेत. थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे फुलोरा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. परिणामी काढणीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्षांचे मणी तडकण्यास सुरुवात झाली आहे. फुलगळ व फळगळसारख्या नुकसानीचा सामना शेतकरी करीत आहेत. फुलोऱ्यात पाणी साचले तर द्राक्ष घड कुजण्याची भीती आहे. ढगाळ वातावरणामुळे अतिरिक्त पावडर फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.