– संदीप घिसे
पिंपरी – विनोद आणि विभा (नाव बदलेले आहे) यांचा शिरूरमध्ये विवाह झाला. कामासाठी पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या विनोदला निमशासकीय संस्थेत काम मिळाले. यामुळे त्यांनी पत्नीला गावी ठेवून भाड्याच्या खोलीत राहण्यास सुरवात केली. मात्र एकेदिवशी विभा पती विनोदला न सांगता सर्व संसार घेऊन शहरात दाखल झाली. त्यावरून पती पत्नीमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. दरम्यानच्या काळात पतीने एका ठिकाणी जागा घेऊन तीन मजली इमारत बांधली. त्यांचा संसार दिवसेंदिवस फुलत चालला होता. विनोद आणि विभा यांना चार मुले झाली. मुले मोठीही झाली. त्याचवेळी विनोद यांच्या आयुष्यातील वादळाला सुरवात झाली. याला कारण होते ती विनोदची अविवाहित मैत्रीण.
विनोदच्या मैत्रिणीवरून घरात भांडणे होत होती. मुलेही कमावती झाल्यावर सर्वांचा विवाह झाला. विनोद एका मुलासोबत कधी शहरात तर कधी गावी राहत होते. मात्र विभाला अजूनही भिती होती ती विनोदच्या मैत्रिणीची. कदाचित विनोदने सर्व संपत्ती त्या मैत्रिणीच्या नावे करून दिली तर काय, आपण पतीसोबत नांदत नसल्याने पती संपत्तीचे काहीही करू शकतो, अशी भिती विभाला वाटू लागली. तर दुसरीकडे सुनादेखील विभाला हिडीस-फिडीस करीत असल्याने त्यांचे मुलांच्या संसारात आता मन रमत नव्हते.
मुलांनी हाकलून दिले तर कुठे जायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. याच भितीतून तिने आपल्याला पतीसोबत नांदण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आधीच मने दुखावली गेल्याने विनोदने विभाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेर आजीबाईंनी आपल्याला पतीसोबत नांदायचे आहे, असा अर्ज महिला सहाय्यक कक्षाकडे दिला. उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांनी विनोद यांना समुपदेशानासाठी बोलावणे धाडण्याची सूचना पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड आणि अनिता जाधव यांना केली. निवृत्त झालेले विनोद हे समुपदेशनासाठी आले.
समुपदेशक वंदना जगताप यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. निवृत्त झालेल्या विनोद यांनी आपण विभासोबत गावी राहू असे सांगितले. अखेर होय-नाय करीत विभादेखील गावी राहण्यास तयार झाल्या. आता आजीबाई झालेल्या विभा यांनी गावाहून आणलेला संसार पुन्हा टेम्पोत भरून गावाला नेला. गेली वर्षभर आजी आजोबांचा संसार सुखाचा सुरू असल्याचे प्रदीप वासाळे यांनी सांगितले.
उतार वयात नवरा आणि बायको यांना एकमेकांच्या आधाराची गरज लागते. संसाररूपी रथाचे एक चाक जरी निखळले तरी संसाराचा गाडा वेगाने पुढे जात नाही. शहरात राहणाऱ्या एका आजीबाईला चार मुले असून आता नातवंडेही आली आहेत. मात्र पतीशी वादविवाद झाल्याने पती एका मुलासोबत तर पत्नी तीन मुलांसोबत राहत होती. आपल्या संसारात सासूची होणारी लुडबूड सुनांना खपत नसल्याने त्यांच्या वादविवाद होऊ लागले. आता आपल्याला पतीसोबत नांदायचे आहे, असा अर्ज आजीबाईंनी पोलिसांच्या महिला सहाय्यक कक्षाकडे दिला. समुपदेशनानंतर आता आजी आजोबाचा सुखाचा संसार पुन्हा एकदा सुरू झाला आहे.