उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
मुंबई : मुलाचे निधन झाल्यानंतर नातवाला भेटण्यापासून आजी-आजोबांना रोखणे योग्य नाही. तसे करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. 10 वर्षांच्या नातवाला भेटण्यास त्याच्या आजी-आजोबांना भेटण्यास मनाई करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
पतीचे निधन झाल्यानंतर सासू-सासरे आपल्याशी चांगले वागणूक देत नसल्याचा आरोप करून याचिकाकर्त्या महिलेने 2010मध्ये माहेर गाठले. कालांतराने दुसरा संसारही थाटला. त्यानंतर नातवंडाची भेट होवू न शकल्याने आजी-आजोबांनी 2014मध्ये कुटूंब न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकाकर्ती महिला मुलाला घेऊन मुंबईमध्ये येईल त्यावेळी आजोबा आजीला भेटू देण्याचे आदेश दिले. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याने त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. कुटूंब न्यायालयाने प्रत्येक शनिवारी न्यायालयाच्या आवारात नातवाला आजी-आजोबांशी भेटण्याची निर्देश दिले.
तसे न केल्यास सदर महिलेला 5 हजारांचा दंड ठोठावण्याचे इशाराही दिला. त्या विरोधात महिलेन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला शांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.